दिल्ली-युपीत व्यवहारांना गती- केरळ-पंजाबमध्ये कोरोना कर्फ्यूमध्ये वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आता देशाच्या बऱयाच भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपासून दिल्लीमध्ये अनलॉक 2.0 सुरू झाले असून मेट्रो 50 टक्के क्षमतेसह धावू लागली आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांना हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीबरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये नियम शिथिल केले आहेत. मात्र, दक्षिणेकडील केरळ, आंध्रप्रदेशात मात्र कोरोना कर्फ्यूच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी केरळ सरकारने लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढविला आहे. यावेळी आवश्यक वस्तू, उद्योगांसाठी कच्चा माल (पॅकेजिंगसह), बांधकाम साहित्य आणि बँकांना विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पंजाब सरकारने काही शिथिलतेसह कोरोना निर्बंध 15 जूनपर्यंत वाढविले आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ‘विकेंड कर्फ्यू’ असणार आहे. तामिळनाडूत कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसचे रुग्णही वाढत असल्यामुळे नियमांमध्ये फार मोठी सूट देण्यात आलेली नाही. तामिळनाडू सरकारने राज्यातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांच्या उपचारासाठी अ?ॅम्फोटेरिसिन बी औषध व इतर औषधे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 कोटी रुपये वाटप करण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीत सोमवारपासून दुकाने उघडण्यात आली. दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये बरीच घट झाली आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनीही कोरोना संसर्ग बराच कमी झाल्याचा दावा केला आहे. ओडिशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,118 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने राज्यातील कर्फ्यूची मुदत 20 जूनपर्यंत वाढविली. सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत कर्फ्यूमध्ये शिथिलता असेल तर सरकारी कार्यालये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत खुली असतील, असे स्पष्ट केले आहे.