हिंदू नेत्यांना वाढण्यात आले गोमांस ः उभा राहिला मोठा वाद
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशच्या सिलहट जिल्हय़ात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बीएनपीच्या हिंदू नेत्यांना गोमांस म्हणजे बीफयुक्त पदार्थ वाढण्यात आले. या इफ्तार पार्टीत 20 हून अधिक हिंदू सामील झाले होते. पार्टीत निमंत्रित हिंदूधर्मीय पत्रकारांनाही कथितपणे गोमांसयुक्त पदार्थ वाढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पार्टीच्या मेन्यूनुसार बीफऐवजी अन्य कुठला खाद्यपदार्थ घेण्याचा पर्यायच नव्हता. या प्रकारानंतर देशात वादंग उभे राहिले आहे. अशाप्रकारच्या आयोजनात सर्वसाधारणपणे मुस्लिमांसोबत अन्य समुदायाचे लोक देखील असतात. परंतु प्लेटमध्ये गोमांसयुक्त पदार्थ वाढण्यात आल्यावर हिंदू कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले.
या घटनेनंतर बीएनपीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कनक कांतिने इफ्तार पार्टीला एक तमाशा ठरविले. इफ्तार पार्टीत आम्ही हिंदू केवळ पाहतच राहिलो असे त्यांनी म्हटले आहे. ज्या सैन्यशासकांनी 15 वर्षांपर्यंत बांगलादेशवर कब्जा करत शासन केले, त्यांनी पाकिस्तान समर्थक जमात-ए-इस्लामीला एक पक्ष म्हणून स्थापित केले. देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राजकारणाला कमजोर करू शकणाऱया घटनादुरुस्ती या पक्षाने सादर केल्याची टीका अजय दास गुप्ता यांनी केली आहे. गुप्ता यांना बांगलादेशचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी सारख्या काही पक्षांनी कट्टरवादी मॉडेल पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांना स्वतःच्या मोहिमेत यश मिळाले नसल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.
बीएनपीच्या 2001-2006 या शासनकाळात बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात अनेक गुन्हे घडले होते. यादरम्यान हिंदूंच्या जमिनी बळकाविण्यात आल्या, मंदिरांवर हल्ले पेले गेले आणि महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. बीएनपीवर युद्धगुन्हय़ांच्या तपासादरम्यान हिंदूंवर हल्ले करण्यासाठी जमात-ए-इस्लामीला मदत करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर 2021 च्या दुर्गा पूजा हिंसेमागे देखील बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा हात असल्याचे समोर आले होते.