जांभळांचा दर सर्वाधिक : चक्क 400 रुपये किलोने विक्री तरीही वाढती मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
पन्नास नव्हे, शंभर नव्हे, दोनशे किंवा तीनशे रुपये सुद्धा नाहीत तर चक्क 400 रुपये किलो हा जांभळांचा दर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बेळगाव बाजारपेठेत रानमेवा दाखल झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक दर हा जांभळांचा आहे. एकेकाळी 5-10 रुपयांना मिळणाऱया जांभळांचा भाव आज भलताच वधारला आहे.
नरगुंदकर भावे चौक, शहापूर भाजीमार्केट याठिकाणी रानमेवा विक्रीस घेऊन बसलेल्या महिला पहायला मिळतात. जांभळे, करवंदे, चिंचा, आवळे, राय आवळे, कैरी, तोतापुरी, काजू मुरटे, ओले काजू असा रानमेवा दाखल झाला आहे. मात्र साधारण दोन-चार दिवसांपूर्वीच जांभळांचे आगमन झाले असून, त्याचा दर मात्र तब्बल 400 रुपये आहे.
अलीकडच्या दिवसात जांभळांना महत्त्व आले आहे. मधुमेहिंसाठी जांभळे गुणकारी आहेत, असा समज आहे. जांभळांच्या बियासुद्धा अधिक गुणकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळेच जांभळांना मागणी वाढली आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना 400 रुपये किलो असे म्हणताच ते डोळे विस्फारतात. मात्र 100 रुपये पाव किलो असे सांगितल्यास भाव कमी करून मागणी करतात. त्यामुळे 100 रुपये पाव किलो असे सांगून साधारण 80 ते 70 पर्यंत पाव किलो जांभळे देत असल्याचे मूळच्या काकती येथील व सध्या बेळगावमध्येच राहणाऱया यल्लव्वा यांनी सांगितले.
लहान आकाराच्या कैऱया मिठात घालून मुरल्यानंतर त्या खाण्याची पद्धत आहे. त्यांना अप्पीमिडी असे म्हटले जाते. कैरीचा दर 200 रुपये किलो असा आहे. करवंदे 40 रुपयांना 1 माप या दराने उपलब्ध आहे. काजू मुरटे 20 रुपयाला पाच मिळत आहेत. ओले काजुसुद्धा विक्रीस आले असून, त्यांचा दर साधारण 120 रुपये ते 140 रुपये असा आहे, असे होनगा येथून येऊन रानमेवा विकणाऱया लखव्वा यांनी सांगितले.
कच्च्या फणसाची आवकही वाढली
मोठा आवळा व राय आवळाही बाजारात दाखल झाला आहे. नवीन चिंचसुद्धा विक्रीसाठी आली आहे. तसेच बाजारपेठेत कच्च्या फणसाची आवकही वाढली आहे. शिवाय आळूच्या मुडल्या, सुरणगड्डासुद्धा बाजारपेठेत पहायला मिळतो आहे.