शेतकरी संघटनेची पणन संचालकांकडे तक्रार : तत्काळ निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदत संपल्यानंतर दिलेला वाढीव कालावधीही संपला आहे. तरीही नोकरभरती, नवीन बांधकाम, ऍडव्हान्स बिले काढणे, कर्मचारी पदोन्नती असे बेकायदा कामे विद्यमान संचालक मंडळ करत आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून तत्काळ प्रशासकांची नियुक्ती करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रघुनाथ जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी दिला. त्यांनी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही याबाबत निवेदन दिले आहे.
तक्रारीत म्हटले आहे, बाजार समितीच्या विद्यमान संचालकांचा कालावधी 26 फेब्रुवारी रोजी संपला आहे. अधिनियमानुसार कोणत्याही सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव पदावधी संपला असल्यास त्या तारखेपासून समितीच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची पदे रिक्त होतात. संचालक अथवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली व्यक्ती निवडणूक होईपर्यंत प्रशासक असते. पण, सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीची मुदत संपून महिना झाला तरी अद्याप प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
मुदत संपलेले पदाधिकारी आणि संचालक कारभार पाहत असल्याने संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक करे यांच्याकडे तक्रार केली. पण विद्यमान संचालकांनी शासनाकडे मुदतवाढ मागितली असल्याने आम्ही प्रतिक्षेत आहोत. तोपर्यंत प्रशासक नियुक्ती करत नाही, असे वेळकाढूपणाचे उत्तर दिले.
मुदत संपलेले सदस्य नोकरभरती, नवीन बांधकाम करणे, त्यासाठीचे परवाने देणे, चालू असलेल्या कामांची ऍडव्हान्स बिले काढणे, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, आदी कामे करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही कोले यांनी पणन संचालकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर परवाने देणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नयेत. असे पणन विभागाचेच आदेश आहेत. पण, विद्यमान बाजार समितीच्या संचालकांनी ले-आऊटमध्ये नसलेल्या जागांचेही वाटप केले असल्याचा संशय कोले यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी करावीच. पण, तत्काळ सांगली बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही कोले यांनी दिला आहे. नवनाथ पोळ, मोहन परमणे, शंकर कापसे, एकनाथ कापसे, गुंडा माळी, रामचंद्र कणसे, सचिन गवळी, फंचू निरवाने, किसन पाटील, अल्लाउद्दीन जमादार, आप्पासो हरताळे, बाशेखान मुजावर, बटू मुळे आदींच्या या तक्रारीवर सह्या आहेत. शेतकरी संघटनेच्या या तक्रारीमुळे बाजार समिती संचालकांचा कारभार चर्चेत आला आहे. पणन संचालकांच्या निर्देशाकडे शेतकरी आणि संचालकांचे लक्ष लागले आहे.