प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर महिना आणि त्यातील नवरात्र उत्सवाचे मंगलमय दिवस जिल्हय़ासाठी दिलासादायक ठरत असून गेल्या दोन दिवसात बाधित वाढ दीडशेच्या खाली राहिली असून दोन निच्चांकी बाधित वाढीची नोंद जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल असा आशावाद जागवू लागलीय. तर जिल्हय़ात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गात एकूण बाधितांची संख्या अडीच लाखांवर गेली असून बाधित वाढीने अडीच लाखाचा टप्पा ओलांडला असला तरी 2 लाख 41 हजार 18 जणांनी कोरोनावर मात करत या लढाईला बळ दिले आहे.
दरम्यान, जिह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 112 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 5 बाधितांचा मृत्यु झाला. तर रविवारी सायंकाळी 22 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी दिलीय.
महाबळेश्वर झाले कोरोनामुक्त
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून दुर्गम महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग फार मोठय़ा प्रमाणावर झाला नाही. मात्र, दुसऱया लाटेत महाबळेश्वर शहरासह तालुक्यातही कोरोना बाधित आढळून येवू लागल्याने थंड महाबळेश्वराचे वातावरण गरम झाले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा महाबळेश्वरात नवीन रुग्ण समोर आले नाहीत. तर गत सलग दोन दिवसात महाबळेश्वर निरंक राहिल्याने महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. आजपर्यंत महाबळेश्वर तालुक्यात एकूण बाधितांची संख्या फक्त 4 हजार 682 एवढी आहे.
सहा तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने
जिल्हय़ात आजमितीस हॉटस्पॉट सातारा, फलटण, खटाव, कराड या तालुक्यात दोन अंकी वाढ असली तरी हे तालुकेही सावरले असून इतर कोरेगाव, माण, पाटण, खंडाळा, जावली, वाई हे सहा तालुके एक अंकी संख्येवर आले असून महाबळेश्वरसह या तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु असल्याने कोरोना संसर्गाचा विळखा सैल झाल्याचा दिलासा सध्या जिल्हावासियांना लाभू लागला आहे.
112 जणांचा अहवाल बाधित
शनिवारी अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. फलटण 31 (37185), सातारा 26 (51602), खटाव 13 (25,721), कराड 12 (39070), कोरेगाव 9 (21877), माण 8 (17832), पाटण 4 (10126), खंडाळा 1 (14,148), जावली 1 (9,997), वाई 1 (15,710), महाबळेश्वर 0 (4,682), व इतर 6 (2143), असे आज अखेर एकूण 2,50,093 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिह्यात 5 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
रविवारी 13 हजार 47 जणांना लस
जिल्हय़ात लसीकरण चांगल्या गतीने झाल्याने एकूण लस घेतलेल्या नागरिकांची संख्या 26 लाख 30 हजार 146 एवढी दिलासादायक झाली आहे. रविवारी देखील 13 हजार 47 जणांना लस मिळाली असून आता पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 18 लाख 53 हजार 439 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 76 हजार 707 एवढी झाल्याने जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दरही खाली घसरला आहे.