पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा मनुष्यवस्ती नव्हती तेव्हापासूनच बहुधा घात-आघात, सकारात्मक-नकारात्मक, गुण-दोष, सत्कर्म-कुकर्म, उच्च-नीच, पाप-पुण्य ह्या संकल्पनांचा उदय झाला असावा. ह्या सर्व शक्ती सातत्याने पृथ्वीच्या अंतापर्यंत कार्यरत राहतील. ह्या शक्तींचे उगमस्थान हे एकमेव ईश्वरीय तत्त्व आहे. चांगले आणि वाईट ह्या ईश्वराच्या दोन बाजू आहेत. मनुष्यप्राण्याला त्याच्या कुवतीनुसार किंबहुना त्याच्या बुद्धीनुसार ह्या शक्तींपैकी कुठलीही शक्ती आत्मसात करता येते.
इंग्रजी भाषेत असे म्हणतात की, VISIONARIES DON’T HAVE AGE म्हणजे ज्यांना दूरदृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांना वयाचे बंधन नसते. प्राचीनकाळी आपल्या देशात असे अनेक सत्पुरुष होऊन गेले आहेत, ज्यांनी खूप मोठे कार्य मनुष्याच्या हिताकरिता करून ठेवले आहे. कठोपनिषदातील नचिकेता हा अशाच दूरदृष्टी प्राप्त झालेल्या महापुरुषांपैकी एक होता. क्षेत्र कुठलेही असो त्या क्षेत्रात जेव्हा अतिशय गहन कार्य केले जाते, ते कार्य जी व्यक्ती करते, त्यामुळे त्या क्षेत्राला त्या व्यक्तीमुळे एक वेगळी ओळख प्राप्त होते. जीवनाच्या आध्यात्मिक आणि लौकिक क्षेत्रात हाच नियम लागू पडतो. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लौकिक जगताची आणि आध्यात्मिक जगताची उत्तम सांगड घालत ह्या दोन्ही क्षेत्रांना स्वतःच्या अलौकिक कार्यामुळे ओळख प्राप्त करून दिली आहे. कष्टेवीण फळ नाही। हा शाश्वत नियम मात्र लौकिक आणि पारलौकिक जगात नेहमीच उपयोगाला येतो. परंतु, हा नियम जीवनात कसा उतरवावा आणि कसा उपयोगात आणावा हे मात्र श्रीसमर्थांनी त्यांच्या आचरणातून सांगितले आहे. म्हणूनच श्रीसमर्थांचे चरित्र हे प्रत्येक मनुष्यास मार्गदर्शक आहे आणि श्रीसमर्थांचा श्रीमददासबोध हा मनुष्यजीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.
व्यवस्थापनशास्त्राचा उगम कधीपासून झाला हे सांगता येत नाही. परंतु, जेव्हापासून मनुष्याने स्वतःच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि काही अंशी आध्यात्मिक जीवनातील अव्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करण्यास सुरुवात केली तेव्हापासून बहुधा व्यवस्थापनशास्त्राचा उगम झाला असावा. पुढे त्यात अनेक नवनवीन बदल होत गेले. काळानुसार, अनेक तज्ञ व्यक्तींनी ह्यात प्रचंड अभ्यास करून नवनवीन शोध लावलेत आणि हे क्षेत्र समृद्ध केले.
साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा श्री समर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथाची निर्मिती केली तेव्हा व्यवस्थापनक्षेत्राला पूर्णत्व प्राप्त झाले. श्रीसमर्थांच्या पूर्वी असलेले व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ आणि त्यांच्यानंतर झालेले ह्या क्षेत्रातील तज्ञांना श्रीमददासबोध ग्रंथ हा दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरतो आहे. श्रीसमर्थांनी व्यवस्थापन क्षेत्राला पूर्णत्व प्राप्त का करून दिले असावे ह्याचे उत्तर म्हणजे श्रीसमर्थ हे संतश्रे÷ सत्पुरुष असल्याने काळाच्याही पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. मनुष्यजीवनातील प्रत्येक स्तरातील अव्यवस्थेला समूळ नष्ट करण्याचे सामर्थ्य श्रीसमर्थांकडे असल्यानेच ते व्यवस्थापनशास्त्राचे जनक आहेत. समर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथात मनुष्य जीवनातील अव्यवस्थेविषयी लिहिले आहे की,
जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहीच नाहीं । अंतर्यामीं ।।
बोलतां येना बैसतां येना । प्रसंग कांहीच कळेना । शरीर मन हे वळेना । अभ्यासाकडे ।। 18/03/06-07
ह्याचा अर्थ असा आहे की, मूर्ख आणि आळशी असल्यामुळे उत्तम गुण अंगी बाणायला हवेत हेच कळले नाही. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक ते ही मिळवायची पात्रता नाही. अन्न वस्त्र निवारा या किमान गोष्टीनाही हा पारखा होतो. धड बोलता येत नाही. समाजात ऊठबस, वर्तणूक कशी हवी हे देखील कळत नाही. आल्या प्रसंगाला तोंड द्यायचे ज्ञान नाही. धाडस नाही. आळशी देह आणि चंचल मन अभ्यासाकडे वळण्याची सुतराम शक्मयताही नाही. ह्या अव्यवस्थेवर कशाप्रकारे मात मिळवावी याविषयी श्री समर्थ म्हणतात की,
शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये ।
बैसले तरी टाकूं नये । मिथ्या दोष ।।
अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगी थोडें चि वाचावे ।
चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ।। 19/02/12-13
ह्याचा अर्थ असा आहे की, चांगल्या माणसांचा आणि उत्तम शास्त्रग्रंथांचा शोध घेण्यास कधीही कंटाळू नये. आपल्या आयुष्याची हीच खरी शिदोरी असते. दुष्ट आणि विचारभ्रष्ट लोकांच्यामधे
राहू नये. त्यांना शक्मयतोवर टाळलेच पाहिजे. परंतु, असा प्रसंग आला तर ते वाईट विचार तिथल्या तिथे सोडून द्यावे. त्यांचे चिंतन केल्यास ते दोष आपल्यातही जडण्याची शक्मयता जास्त असते.
आर्त म्हणजे जो मुमुक्षू असतो तो. आपण चुकीचे वागतो आहोत हे ज्याच्या लक्षात येते आणि ज्यास ह्याचा कायमस्वरूपी पश्चात्ताप होतो तो मुमुक्षू असतो. अशा मनुष्यास थोडेसेच वाचून दाखवावे मग तो सहजच अध्यात्माकडे खेचला जाईल.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास असे जाणवते की कुठल्याही औद्योगिक संस्थेत किंवा उद्योग समूहात प्रत्येक घटकाचे म्हणजेच उद्योग समूहाचा मालक, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि कामगार ह्यांचे व्यक्तीनिर्माण होणे गरजेचे आहे. कारण, त्यांच्या मानसिकतेतला सकारात्मक बदलच श्रीसमर्थांना अपेक्षित आहे. असा बदल झाल्यासच संबंधित औद्योगिक संस्थेत किंवा उद्योग समूहातील व्यवस्थापनक्षेत्र हे पूर्णत्वास जाऊ शकते. श्रीसमर्थांनी पुढे व्यवस्थापनक्षेत्र हे कसे पूर्णत्वापर्यंत पोहोचू शकते ह्याबाबत म्हटले आहे की,
अधिकारपरत्वें कार्य होतें ।
अधिकार नस्तां वेर्थ जातें । जाणोनि शोधावी चित्तें । नाना प्रकारें ।। अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणे । आपला मगज राखणें ।कांहींतरी ।। 11/10/22-23
अधिकार म्हणजे योग्यता. योग्य माणसाच्या हातून कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडते. योग्यता नसलेल्या माणसाच्या हाती सोपवलेल्या कार्याचा नाश निश्चित असतो. ह्याकरिताच जबाबदारी सोपवण्यापूर्वीच अनेकांना तपासून पहावे. त्यामुळे पुढील धोका टळतो. अधिकार तपासून सिद्ध झाला की योग्य त्या व्यक्तीकडे कार्यभार सोपवावा आणि कामाचा झपाटा पाहूनच त्यावर विश्वास ठेवावा. आपली बुद्धी शुद्ध असेल तर योग्य ती निवड होतेच आणि सहकाऱयांवरील विश्वासही वाया जात नाही.अव्यवस्था म्हणजेच आळस, दैन्य, दुःख, राक्षस आहे. तर, व्यवस्थितपणा म्हणजेच ह्या दैन्यावर, राक्षसावर मिळवलेला विजय आहे. हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे जगदंबेने महिषासुरमर्दिनीमातेने जसे महिषासुराचा वध केला तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील अव्यवस्थेचा, चुकांचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हेच उत्तम व्यवस्थापकाचे कार्य होय!
व्यवस्थापनक्षेत्रात जे लोक कार्यरत आहेत त्यांनी श्रीसमर्थांच्या श्रीमददासबोधाचा अभ्यास केल्यास त्यांना व्यवस्थापनक्षेत्रातील यशासाहितच त्यांना आध्यात्मिक जीवनातील यश प्राप्त होऊ शकते.
-माधव किल्लेदार