मंत्र्यांच्या पत्रानंतर ऍलोपथीविषयक विधान घेतले मागे
वृत्तसंस्था/ हरिद्वार
योगगुरु बाबा रामदेव यांनी ऍलोपेथिक उपचारपद्धतीबद्दल केलेले विधान मागे घेतले आहे. त्यांच्या या विधानावर डॉक्टरांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी पत्र लिहून बाबा रामदेव यांना विधान मागे घेण्याची सूचना केली होती. वैद्यकीय शास्त्राच्या सर्व अंगांचा सन्मान करतो, ऍलोपथीने अनेक जीव वाचविले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपचारपद्धतींच्या संघर्षाच्या या पूर्ण वादाला पूर्णविराम देत स्वतःचे विधान मागे घेत असल्याचे बाबा रामदेव यांनी हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
ऍलोपथीशी संबंधित आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर अथक मेहनत करून कोरोनाबाधितांचा जीव वाचवत आहेत. तुमच्या विधानामुळे कोरोना विरोधातील लढाई कमकुवत होऊ शकते. तुम्ही तुमचे विधान मागे घ्याल अशी अपेक्षा असल्याचे हर्षवर्धन यांनी पत्राद्वारे बाबा रामदेव यांना कळविले होते.
तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून बाबा रामदेव यांच्या विधानावर आक्षेप नोंदविला होता. आयएमएने रामदेव यांच्याविरोधात खटला चालविण्याची मागणीही केली होती.
ऍलोपेथिक औषधे आणि डॉक्टरांवरील टिप्पणीमुळे देशवासीय दुखावले गेले आहेत. देशवासीयांसाठी कोरोना विरोधात लढत असलेले डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी देवासमान आहेत. लाखो कोरोनाबाधितांचा मृत्यू ऍलोपथीच्या औषधांमुळे ओढवल्याचे म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना महामारीच्या विरोधात सामूहिक प्रयत्नांमधूनच विजय मिळू शकतो. या लढाईत आमचे डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव जोखिमीत टाकून लोकांना वाचवत आहेत असे हर्षवर्धन यांनी पत्रात नमूद पेले आहे.