प्रतिनिधी/ पणजी
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर हे हॉटेलवाल्यांची छळवणूक आणि सतावणूक करीत असल्यानेच राज्यातील 4000 हॉटेल्सपैकी फक्त 250 हॉटेल्सनीच खुले करण्याची तयारी दर्शवून नोंदणी केली. बाकीच्या हॉटेल्सनी कंटाळून नकारच दर्शवला असा आरोप काँग्रेसने केला आहे. अशा मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. कळंगुट-हणजूणा ज्या भाजप आमदाराने ‘बर्थ डे’ पार्टी केली त्यास अटक करावी असेही श्री पणजीकर म्हणाले. गोव्यात बेकायदा पर्यटक येऊन रहातात अशी कबुलीच मंत्री देतात असा ठपकाही काँग्रेसने ठेवला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पणजीकर यांनी सांगितले की पर्यटन खात्यातील एक अधिकारी हप्ते गोळा करतो आणि त्याची नावासह तक्रार ट्रव्हल्स आणि टुरीझम असोसिएशन गोवा या संघटनेने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली आहे. त्याची दखल ते घेत नाहीत आणि कारवाईही करत नाहीत. त्यामुळे डॉ. सावंत यांची भूमिकाही संशयास्पद आहे. हिंमत असल्यास त्यांनी कारवाई करावी किंवा तक्रार नाही असा तरी खुलासा करावा असे आव्हान श्री. पणजीकर यांनी दिले.
केपीएमजी या कंपनीवर अनेक आरोप झाले ती कंपनी गोवा विधानसभेतही गाजली. त्याच कंपनीला हे पर्यटनमंत्री पुन्हा कंत्राटे देतात याबाबत श्री. पणजीकर यांनी आश्चर्य प्रकट केले. पर्यटनमंत्र्यांच्या छळवादास हॉटेलवाले कंटाळले असून निराश झाले आहेत म्हणूनच त्यांनी हॉटेलांची नोंदणी खुली करण्यास प्रतिसाद दिला नाही. एवढा अल्प प्रतिसाद मिळाल्याने हॉटेलवाले व्यवसाय करण्यास इच्छुक नाहीत हे स्पष्ट होते त्याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यटनमंत्रीच आहे असे श्री. पणजीकर यांनी नमूद केले.
त्या हॉटेल्स असोसिएशनला कोण विचारत नाही, त्यांच्याशी चर्चा नाही, त्यांना भेटीची वेळ देण्यात येत नाही असे अनेक आरोप काँग्रेसतर्फे श्री. पणजीवर यांनी केले आणि आजगावकरांना पर्यटनमंत्री पदावरून हटवावे अशी मागणी केली.