श्रद्धा मावरकरच्या पालकांचा आरोप : आज काढणार मोर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
ढोर गल्ली, गोकाक येथील श्रद्धा मावरकर या 9 वर्षांच्या मुलीला साध्या टॉन्सिलच्या ऑपरेशन करिता बेळगावच्या बिम्समध्ये दाखल केले होते. परंतु येथील डॉक्टरांनी उपचार करताना हलगर्जीपणा केला. यामध्येच तिचा दुदैवी अंत झाला. ही एक प्रकारची हत्या असून या बिम्स प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी व जीवनमुखी फौंडेशच्या सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
श्रद्धा परशुराम मावरकर हिला 20 डिसेंबरला बिम्स येथे ऑपरेशनसाठी आणण्यात आले होते. टॉन्सिलच्या ऑपरेशनवेळी मुलगी कोमात गेली. यामध्ये तिचे 25 रोजी ह्रदयविकाराने निधन झाले. तिला भूलीचा डोस अधिक प्रमाणात देण्यात झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बालिकेवर वेळेत योग्य उपचार झाले असते तर तिचा जीव वाचला असता, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या विरोधात आवाज उठविणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेवेळी जीवनमुखी फौंडेशनचे सेपेटरी किरणकुमार पाटील, श्रद्धाची आई श्रीदेवी व वडील परशराम हे उपस्थित होते.
आज काढणार मोर्चा
बिम्स प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अशा डॉक्टर व अधिकाऱयांवर कारवाई होऊन श्रद्धा मावरकर हिला न्याय मिळावा, याकरिता शनिवार दि. 25 रोजी सकाळी 11 वा. बिम्सपासून राणी चन्नम्मा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.