योगी आदित्यनाथ यांची दिल्लीत प्रचारसभा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील निवडणूक प्रचारात शनिवारी भाग घेतला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचा मुद्दा उपस्थित करत योगींनी केजरीवाल सरकारला लक्ष्य केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख करत योगींनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळय़ा खात असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करणारे लोक शाहीनबागमध्ये निदर्शने करत ‘आझादी’च्या घोषणा देत आहेत. अरविंद केजरीवाल यांचे सरकार दिल्लीवासीयांना स्वच्छ पाणी उपलब्ध करू शकले नाही, मात्र शाहीन बागमध्ये निदर्शकांना ‘बिर्याणी’ वाटत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
शाहीन बाग निदर्शकांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली, याच कारणामुळे अशा लोकांना या विकसित होऊ घातलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’मुळे पोटदुखी होत असल्याचे योगींनी पूर्व दिल्लीतील करावल नगर चौकात आयोजित सभेत म्हटले आहे.
दिल्लीच्या विविध भागांमध्ये होत असलेली निदर्शने ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नसून त्यांचा भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे जळफळाट होत असल्याचे योगी म्हणाले. शाहीन बागमध्ये होत असलेल्या निदर्शनाबद्दल असहमती व्यक्त करण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन भाजप नेते करत आहेत.