येळ्ळूर ग्राम पंचायत बैठकीत चर्चा, पीडीओंनी दिली ताकीद
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या अखत्यारिमध्ये सर्व्हे क्रमांकामध्ये बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची नोंद करून विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे यापुढे अशाप्रकारे बेकायदेशीर प्लॉट्स किंवा त्यांची नोंद करून घेतली जाणार नाही, असा येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीर कामांना आळा बसणार असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
येळ्ळूर गावचा विस्तार वाढत चालला आहे. गावाशेजारी असलेल्या सर्व्हे क्रमांकामध्ये प्लॉट पाडले जात आहेत. त्यांची नोंद केली जात आहे. त्यानंतर संबंधित प्लॉटधारक तसेच घरमालक नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा मागण्या करत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतवर त्याचा ताण वाढत आहे. राज्य सरकारनेही याबाबत केवळ येळ्ळूरच नाही तर संपूर्ण राज्यामध्येच अशाप्रकारे बेकायदेशीररित्या सर्व्हे क्रमांकामध्ये प्लॉट पाडून विक्री होत असेल तर आळा घालण्याबाबत आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये सर्व्हे क्रमांकामध्ये असलेल्या जागांची नोंद करून अनेकांनी इमारती बांधल्या आहेत. त्यानंतर ग्राम पंचायतमध्ये त्याची नोंद केली जात आहे. मात्र यामुळे ग्राम पंचायतीला मोठा फटका बसत आहे. अशाच वसाहती वाढत राहिल्यास सोयी-सुविधा उपलब्ध करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबत गांभीर्य घेतले असून तसा आदेश दिला आहे, अशी माहिती मिळाली आहे. लोकसंख्या जशी वाढत जाईल त्यानुसार ग्राम पंचायतीचा विस्तार वाढत जाणार आहे. मात्र त्याला बरेच नियम आहेत. त्या नियमांचे पालन करत विस्तार वाढविणे गरजेचे आहे. मात्र बेकायदेशीररित्याच अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. रस्ते नाहीत, वीज नाही, गटारी नाहीत, पाणी नाही, असे असताना वसाहती केल्या जात आहेत. त्यानंतर या सर्व व्यक्ती ग्राम पंचायतकडे आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत आहेत. कर कमी मिळत असल्याने सुविधा पुरविणे अशक्मय आहे. याचबरोबर सरकारकडूनही मिळणारा निधी कमी असल्यामुळे सर्वांना न्याय देणे अशक्मय आहे. त्यासाठी आता यापुढे बेकायदेशीर वसाहतींना आळा घालण्याच्या दृष्टिने पाऊल उचलले जाणार आहे.
येळ्ळूर, अवचारहट्टी, सुळगा रोडवर अनेक ठिकाणी वसाहती निर्माण करण्यासाठी प्लॉट तयार करण्यात आले आहेत. अनेकांनी रस्ते केले आहेत. मात्र आता त्यांची नोंद करून घेतली जाणार नाही. बेकायदेशीररित्या वसाहती उभारण्यात आल्या आहेत. सर्व्हे क्रमांकामध्ये घरांची उभारणी करून नोंद करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.