सा.बा.खात्याच्या पाणी विभागासह, आमदार,सरपंचाचे दुर्लक्ष
वार्ताहर / दाभाळ
पणसपाणी-बेतोडा भागातील नागरिकांना मागील दोन महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी मिळवण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून खासगी टॅंकर बोलवून गरज भागवावी लागत आहे. पाणी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे.
मागील दहा बारा वर्षापासून बेतोडा परिसरात फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागते. मागिल दहा वर्षापासून येथील लोकांची सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी आजपर्यंत पुर्ण करण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आलेले आहे. माजी तसेच विद्यमान आमदार, सरपंच, पंचसदस्यांनी कधीच या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलेले नाही. प्रत्येकवेळा येथील लोकांना खोटी आश्वासने देऊन भोवळण केली जाते. प्रत्येक निवडणूकीत हा विषय प्रामुख्याने चर्चेत येतो. निवडणूक झाल्यानंतर पुढे काहीच होत नाही अशी खंत पणसपाणीवासियांनी व्यक्त केली आहे.
डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत 1 कोटी 12 लाख रूपये खर्चुन कोडार ते बेतोडा पर्यंत जलवाहिनीचा विस्तार करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. 150 मि.मि. व्यास क्षमतेची डिआय दर्जाची जलवाहिनी टाकण्यात आली होती व फेब्रुवारी पासून बेतोडा परिसरातील सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल असे आश्वासन आमदार सुभाष शिरोडकर यांनी जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ करतेवेळी सांगितले होते. परंतू आता एप्रिल महिना संपायला आला तरी जलवाहिनी काम अद्याप पुर्ण झालेली नाही. यावरून आमदार सुभाष शिरोडकर यांना जलवाहिनीबाबत किती गांभीर्य आहे ते दिसून येते असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. कित्येकवेळा येथील नागरिकांनी ही गोष्ट सुभाष शिरोडकर यांच्या नजरेस आणून दिली. तरीही त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे नागरिकांनी बोलवून दाखविले. जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ करतेवेळी त्यांनी बेतोडा आासपासच्या भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी साळावली, म्हैसाळ व ओपा पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करू असेही सांगितले होते परंतू पुढे काय झाले हे त्यांनाच माहित असेही काही लोकांनी बोलून दाखविले.
या भागातील बरीच कुटूंबे आजही शेती व बागायतीवर उदारनिर्वाह करीत आहेत. शेतात व मळरानात राबल्यानंतर घरी पाण्याच्या सोय करण्याची नौबत रोज येत असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. येत्या दिवसात या भागात पाणी पुरवठा न झाल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दाग फोंडा येथील पाणी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.