खानापूर म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
छत्रपती शिवाजी महाराज आणि भगव्या झेंडय़ाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलेली संधी वाया जाऊ न देता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिलेदारांनाच महापालिकेत निवडून पाठवा, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत म. ए. समिती पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी देवाप्पा गुरव होते.
ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत म्हणाले, खानापूर तालुक्यातील बेळगावस्थित मराठी बांधवांनी गटतट विसरून समिती उमेदवारांच्या विजयासाठी झटावे, महानगरपालिकेची निवडणूक ही एकटय़ा बेळगावकरांची लढाई नाही. या निवडणुकीशी आपला काही संबंध नाही, असे समजून बेफिकीर राहू नये.
कार्याध्यक्ष मारुती परमेकर म्हणाले, काही ठिकाणी म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार देता न आल्याने मराठी भाषिकांनी सीमाप्रश्न आणि चळवळीला पोषक असणाऱया व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाचे पालन करावे, अशी बैठकीत विनंती करण्यात आली. तसेच बेळगाव महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या दोन्ही गटात ऐक्य साधण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मार्केटींग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला चिटणीस गोपाळ देसाई, पी. एच. पाटील, संभाजी देसाई, रणजीत पाटील, सूर्याजी पाटील, विनायक सावंत, दत्तू कुट्रे, राजू पाटील आदी उपस्थित होते..