ऑनलाईन टीम / मुंबई :
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
ते म्हणाले, पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचा भाग म्हणून शासन निधी देईल. साईबाबांचे जन्मस्थळ आहे म्हणून हा निधी दिला जाणार नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे शिर्डीकरांचे समाधन झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतर शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले, अशी घोषणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर प्रसार माध्यमाला दिली.
जगाला ‘सबका मालिक एक’चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. साई जन्म वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
विखे पाटील म्हणाले, आज मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडली. पाथरीच्या विकासाला किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासाला आमचा विरोध नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर आमचे समाधान झाले आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.