‘सौंदर्य म्हणजे काय’ या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण आहे. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. भारतातील जास्तीत जास्त लोक गव्हाळ रंगाचे आहेत. अनुवंशशास्त्रानुसार, भारतातील पुरुषांची सरासरी उंची 5 फूट 5 इंच आहे तर स्त्रियांची सरासरी उंची 5 फूट आहे. पाश्चात्य देशांमधील स्थानिक लोक साधारणतः पांढऱया त्वचेचे आहेत, तर आफ्रिकेत आपल्याला सुंदर गडद तपकिरी त्वचा असलेले लोक सापडतील. अमेरिकेतील पुरुषांची सरासरी उंची 5 फूट 9 इंच आहे, तर स्त्रियांची 5 फूट 3.5 इंच आहे. प्रत्येक देशातील लोक त्यांचे भौगोलिक स्थान आणि अनुवंशशास्त्रामुळे भिन्न आणि अद्वितीय दिसतात. जितके देश, तितकी माणसं आणि जितकी माणसं तितकीच विविध त्यांची रूपं.
मग जगातील 799 कोटी लोकांमधली सगळय़ात सुंदर व्यक्ती कोण आणि ते कसे ठरवायचे? या जगात अनेक प्रतिभावान लोक आहेत, पण तरीही आपण अशा जगात राहतो, जिथे व्यक्तीच्या गुणापेक्षा बाह्य रूपाला जास्त महत्त्व दिले जाते. माणसाच्या त्वचेचा रंग (एक अशी गोष्ट जी त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे), त्याचा शरीराचा आकार आणि त्याचे कपडे, या सर्व गोष्टी व्यक्तींच्या भावना, व्यक्तिमत्त्व आणि कौशल्यांपेक्षा अधिक महत्त्वाच्या ठरतात. भारतातील हास्यास्पद गोष्ट अशी आहे की येथे जास्तीत जास्त लोकांची तपकिरी त्वचा असूनही, आपण गडद रंग असलेल्या एखाद्याची थट्टा करतो. तसेच माणसाचे शरीर हे सतत बदलत असते.
बालपणापासून ते मोठेपणापर्यंत, आपले शरीर सतत बदलत असते. हे केवळ नैसर्गिक वाढीमुळे होत नाही, तर आपल्याला मिळणाऱया अन्नाचा, पोषणाचा, आपल्या पर्यावरणीय परिस्थितीचा आणि मानसिक आरोग्याचादेखील प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. ही मानसिकता कुठून निर्माण झाली याच्या खोलापर्यंत जायला हवे.
ही मानसिकता सुरुवातीपासूनच कायम आहे का? तर नाही. याचा पुरावा म्हणजे आपले ग्रंथ, पुराणातील गोष्टी आणि इतिहास आहे. हिंदू समाजामध्ये कृष्णाला विष्णूचा अवतार म्हटले आहे. महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यामध्ये कृष्ण मध्यवर्ती पात्र असून अनेक हिंदू तत्त्वज्ञानात्मक, तात्त्विक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. हेच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या गडद त्वचेसाठी ओळखले जातात. संस्कृत भाषेमध्ये ‘कृष्ण’ या शब्दाचा अर्थ ‘निळसर काळा किंवा गडद’ असा होतो.
भारतात, पांढऱया त्वचेकडे आणि परिपूर्ण शरीराकडचे आकर्षण अनेक गोष्टींमुळे सुरू झाले. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश शासन होते, तेव्हा त्यांनी ‘डिव्हाइड अँड रुल’ तत्त्वाचा वापर करून भारतीय विविधतेत फाटे पाडायला सुरुवात केली. ज्यामुळे जातीव्यवस्था वाढली. त्यावेळेला इंग्रज हा भारतातील एकमेव सत्ताधारी असल्याने त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे ते सत्तेवर आहेत असा विचार लोकांचा मनामध्ये बिंबवला गेला. म्हणून, विशिष्ट त्वचेचा रंग असणे हे श्रे÷तेचे लक्षण मानले जाऊ लागले.
आजही आपण कित्येकदा शाळेत, घरामध्ये, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये पाहतो की गडद तपकिरी रंगाच्या लोकांना कमी लेखले जाते, त्यांची थट्टा केली जाते. चित्रपटांमध्ये, मुख्यतः गोऱया त्वचेच्या लोकांना मुख्य पात्र म्हणून नेमले जाते तर गडद तपकिरी कातडीचे लोक खालच्या आर्थिक जातीचे लोक म्हणून दर्शविले जातात. लहानपणापासून मुला मुलींना हे सांगितले जाते की त्यांचा रंग जर गोरा नसला तर त्यांना चांगला जीवनसाथी मिळणार नाही.
मनुष्यजात खरंच एवढी पोकळ आहे का की त्याची ओळख केवळ त्वचेच्या रंगावरून किंवा शरीराच्या आकारावरून होऊ शकते? असे जर असते तर जगात क्रांती घडवलेल्या प्रत्येक माणसाची त्वचा गोरी गोमटीच असायला हवी होती ना? समस्या ही नाही की लोकांची त्वचा गोरी नाही किंवा शरीर प्रमाणबद्ध नाही, समस्या ही आहे की मानवाची ही विध्वंसक मानसिकता जी आपल्यातील मानवतेचा नाश करत आहे. जर हत्तीचा रंग तपकिरी किंवा राखाडी नसला तरीही तो जगातील सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक असेल का? हो नक्कीच, कारण हत्ती त्याच्या रंगामुळे बलवान आणि शक्तिशाली नाही होत, तर त्याच्या अवाढव्य शरीरामुळे आणि त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे होतो. तसेच, कोणत्याही माणसाचे मूल्य त्याच्या दिसण्यामुळे आणि त्याच्या त्वचेच्या रंगामुळे निश्चित केले जाऊ शकत नाही. माणसाचे समाजातील स्थान हे त्याचे व्यक्तिमत्त्व, समाजातील त्याचे कार्य आणि त्याच्या दयाळूपणावरून निश्चित केले जाते.
समाज हळूहळू बदलत आहे आणि प्रत्येक धर्माच्या, जातीच्या आणि रंगाच्या लोकांना सामावून घेत आहे. पण अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या बाह्य रूपामुळे न्यूनगंड वाटतो. सामाजिक स्तरावर हा बदल तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण नवीन, प्रागतिक विचार आपल्या संस्कारांद्वारे आपल्या घरच्याना देऊ. कुठल्याही व्यक्तीचा दुसऱया माणसाच्या शरीरावर किंवा रंगावर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. आपण बोललेल्या निरुपद्रवी वाटणाऱया शब्दांचा समोरच्या माणसावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. या जगात कोणीही परिपूर्ण नाही. माणूस आयुष्यात चुका करूनच शिकतो आणि प्रगती करतो. जर कोणाला आपल्या शरीराबद्दल किंवा रंगाबद्दल न्यूनगंड असेल, तर त्याची टीका करून त्याला कमी लेखण्यापेक्षा, आपण त्यांना प्रेरित केले पाहिजे जेणेकरून त्यांची सकारात्मक मानसिकता विकसित होईल. लोकांना असे वाटते की जर त्यांनी दुसऱयाच्या शरीरावर टीका केली तर ते बदलण्यासाठी प्रेरित होतील. पण प्रत्यक्षात मात्र त्यामुळे अधिक हानीच होते आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. आपले मानवी शरीर हे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे आणि त्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. पण बरेचदा बाहेरून सोपे वाटणारे उत्तर कधीतरी खूप गुंतागुंतीचे असते.
कधीकधी अनुवांशिकता आपल्या शारीरिक देखाव्यामध्ये मोठी भूमिका बजावते. त्याचप्रमाणे, बरेच लोक थायरॉईड आणि पीसीओडीसारख्या रोगांना सामोरे जात आहेत. ज्यामुळे शरीरातील संप्रेरक असंतुलित होतात. अशा वेळेला जर एखाद्याच्या शरीरावर/रंगावर टीका केली की त्याला किती वाईट वाटत असेल?
जग जेव्हा इतर क्षेत्रामध्ये एवढी झपाटय़ाने प्रगती करत आहे तेव्हा या छोटय़ा छोटय़ा सामाजिक गोष्टींमध्ये का मागे पडत आहे? जगाच्या प्रगतीबरोबर जर समाजाच्या प्रगतीचादेखील विचार केला तर माणूस केवळ सुखी नाही, आनंदी देखील राहील.
-श्राव्या माधव कुलकर्णी