वार्ताहर / दाभाळ
गवळीवाडा-निरंकाल येथे वास्तव्यास असलेल्या वानरमारे कुटुंबियांना ब्रह्माकुमारीजच्या फोंडा शाखेतर्फे अन्न व धान्य पुरवठा वितरीत करण्यात आला. लॉकडाऊनमुळे या भटक्या जमातीच्या लोकांना हाताशी काम नसल्याने घरीच बसून राहावे लागत होते. हाती पैसे नसल्याने दैनंदिन गरजा कशा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सरकारी यंत्रणा व काही समाजसेवी संस्थांनी त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. ब्रह्मकुमारीज या आध्यात्मिक संस्थेनेही आता त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. वानरमारे समाजातील साधारण 20 कुटुंबे मिळून शंभर लोक या ठिकाणी वास्तव्यास असून ब्रह्माकुमारीतर्फे त्यांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या. ब्रह्माकुमारीजच्या शोभा बेहनजी यांनी वानरमारे कुटुंबियांना स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष भाई, विनोद भाई, रमाकांत भाई, दिनेश भाई व रेश्मा बेहनजी हे ब्रह्माकुमारीजचे अनुयायी उपस्थित होते.