भगवान महावीर या धरतीला विश्वाला लाभलेले 24 वे तीर्थंकर, ज्यांनी अहिंसा, करुणा, संयम आणि मानवतेचा महामंत्र संपूर्ण जगाला देऊन मानव कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. उद्या रविवारी त्यांची जयंती म्हणजे जन्मकल्याणक आपण साजरा करत आहोत.
त्यांचा जन्म इ. स. पूर्व 599 मध्ये राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. या राजकुमाराचे नाव वर्धमान. लहानपणापासूनच त्यांना राजवैभवाचे आकर्षण नव्हते. सर्व सुख परित्याग करून दीक्षा घेण्याचा त्यांचा संकल्प लहानपणीच होता. मात्र आईच्या व परिवारजनांच्या आग्रहामुळे त्यांनी विवाह केला. परंतु त्यात ते रमलेच नाहीत. भगवान महावीर यांनी विवाहानंतर दीक्षा घेतली, संन्यास घेतला. याचे प्रमुख कारण त्यावेळी वाईट प्रवृत्ती, चुकीच्या रूढी परंपरा, निर्धनता व त्यामुळे होणारे अन्याय, दुःख, यज्ञामध्ये प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर आहुती दिली जायची. प्राण्यांचा आक्रोश, चित्कार यामुळे भगवान महावीरांचे मन विषण्ण झाले आणि त्यांनी सर्वप्रथम अहिंसेचा उद्घोष केला. म्हणूनच त्यांना ‘अहिंसेचा अवतार’ संबोधण्यात येते. भगवान महावीर यांनी विवाहानंतर दोन वर्षातच राजवैभव, सत्ता संपत्तीचा त्याग करून साधुत्वाची दीक्षा घेतली आणि बारा वर्षे तपश्चर्या करून ज्ञानार्जन, विचारमंथन केले आणि परिणामी त्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली. विश्वाला मैत्री, शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवण्यासाठी तीस वर्षे भारतभर पायी भ्रमण करून त्यांनी जैन सिद्धांताचा प्रचार केला. लोभ, क्रोध, मोह, विलासीतता यावर खऱया अर्थाने अंकुश आणणे म्हणजे विजय मिळवणे असे ते मानतात.
भगवान महावीरांनी पाच व्रतांचा प्रकर्षाने आपल्या वाणीतून उल्लेख केला. अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे) ब्रह्मचर्य (इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे) अपरिग्रह (संग्रह न करण्याची वृत्ती). जैन तत्त्वज्ञानामध्ये आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणाचा उपदेश त्यांनी दिला आहे. भगवान महावीर यांचा सारांश आणि त्यांचे प्रमुख विचार म्हणजे सत्संगती आणि जनमार्गानेच जीवनाची उन्नती होते. आपल्या वाणीवर आचरणावर नियंत्रण असावे. दुसऱयाबद्दल वाईट चिंतू नका. स्वतःमधील वाईट प्रवृत्तीबरोबर लढा, बाहेरील शत्रूबरोबर लढण्याआधी स्वतःच्या वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवा. आपल्या दोषांचा अभ्यास करून दोषमुक्त होण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःच्या इंद्रियांवर विजय प्राप्त करेल त्यालाच आत्मानंद प्राप्त होईल, जो निरंतर राहील. खरा शत्रू आपल्या आत वास करत असतो. ते शत्रू म्हणजे क्रोध, लोभ, मोह, माया, आसक्ती, ईर्षा, मत्सर, यांच्यावर विजय मिळवूया, यांच्यावर अंकुश लावूया. यांच्यावर ताबा मिळवूया म्हणजे सर्व मंगल होईल. अंतिम विजय सत्याचाच असतो.
पाच तत्त्वांचे पालन करा
आपण रोज वर्तमानपत्र उघडतो तेव्हा त्यातील बातम्या वाचून मन उद्विग्न होते ते भ्रष्टाचाराच्या, लैंगिक अत्याचाराच्या, चोरी, दरोडय़ाच्या, खून, खंडणी, गुंडगिरी आणि वैफल्यग्रस्त व्यक्तींच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून, सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातही अनेक घटक जसे लस, ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड वेळेवर मिळत नाही. मन अगदी सैरभैर होऊन जाते व विचार येतो तो कुठे चालला आहे समाज, नक्की कुठे चुकत आहे, कोण चुकत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विकृत व स्वार्थी मनोवृत्ती या कारणांमुळे समाजाचे हे अतिशय वाईट चित्र दिसते. मग अशावेळी आठवतात ते या देशातील महापुरुषांचे विचार, महात्म्यांचे आचार आणि इतर तीर्थंकरांची शिकवण, प्रवास, संस्कार. खरंच त्यांनी सांगितलेली शाश्वत तत्त्वे नक्कीच फलद्रुप होतील जर ती अंगिकारली, आचरली, त्यांचा अनेकांत वाद, पाच तत्त्वे, मानवतावादी विचारसरणी जनसामान्यात रुजवली तर. आज त्यांची पुन्हा उजळणी करण्याची वेळ आली आहे. आज माणूस भौतिक सुखाच्या कल्पनेत मश्गूल झाला आणि लालसेपोटी सर्वार्थाने स्वतःचेच नुकसान करू लागला. आपण बघतो पर्यावरणाचा ऱहास होतो आहे. त्यामुळे अनेक आजार डोके वर काढून जनजीवन विस्कळीत करत आहेत परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याची जपणूक करण्याची शिकवण महावीरांनी आधीच देऊन ठेवली आहे.
अनेक रोगांचे कारण आहार किंवा विकृत जठराग्नी सांगितले आहे व त्यावर उपवास तप हे आधीच त्यांच्या शिकवणीत आहे. ‘मेडिटेशन’ आज काळाची गरज आहे. अनेक लोक डिप्रेशनमध्ये जाताना आपण बघतो. यावरही तप, ध्यान त्यांनी आधीच सांगून ठेवले आहे. थोडक्मयात त्यांच्या संपूर्ण शिकवणीत विज्ञान आहे, दूरदृष्टीकोन आहे. तो प्रत्येकाने अवलंबला तर नक्कीच जीवनाचे सार्थक होईल. 21 व्या शतकात ज्याची आपल्याला नितांत गरज आहे. ‘जियो और जीने दो’ ही त्यांची शिकवण आत्मसात करूया, सत्यमेव जयते, अहिंसा ही परमो धर्म.
डॉ. वैशाली लोढा, पुणे