प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात असतानाही आदेश धुडकावून लावत अनेकजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भरणे, वेरळ, बीएसएनएल कार्यालय आदी ठिकाणी सोमवारी सायंकाळच्या सुमारास विनाकारण फिरणाऱया 109 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
20 एप्रिलपासून संचारबंदीचे नियम काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. हे केवळ उद्योगांसाठीच असून नागरिकांना कोणतीही मुभा देण्यात आलेली नाही. कोरोनाचे लॉकडाऊन उठले, असा समज करत सोमवारी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. चारचाकी वाहनांसह दुचाकीस्वार विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सामवारी सकाळपासूनच कोणत्याही मार्गावर कोणत्याही क्षणी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. या कारवाईत शेकडो वाहनचालक कारवाईच्या कचाटय़ात अडकले. या पाठोपाठ भरणे, वेरळ परिसरातही सायंकाळच्या सुमारास नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱयांना ताब्यात घेण्यात आले. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हे नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या ताब्यातील वाहने जप्त करत 3 हजार 400 रूपयांचा दंड आकारण्यात आला. वेरळ परिसरात विनाकारण फिरणाऱया नागरिकांना पोलिसांनी धारेवर धरत उठाबशा काढण्यास भाग पाडले.
पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सोमनाथ कदम व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. 3 मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत यापुढेही धडक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.
खेड पोलिसांची अशीही गांधीगिरी
कोरोनामुळे संचारबंदी कडक असतानाही नागरिकांची गर्दी अजूनही कायमच आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. येथील पोलिसांनी गांधीगिरी करत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांना मंगळवारी प्रतिज्ञा दिली. ‘हे परमेश्वरा, आम्हाला माफ कर. आम्ही सर्व मूर्ख आहोत. विनाकारण रस्त्यावर फिरत आहोत. जोपर्यंत कोरोना संपत नाही, तोपर्यंत रस्त्यावर फिरणार नाही’ अशी प्रतिज्ञा पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱयांना दिली.