पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाच राज्यांतील निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने काँग्रेसचे भवितव्य काय, हा प्रश्न आता अधिक गडद झालेला दिसतो. या पार्श्वभूमीवर पराभवाची मीमांसा व आत्मचिंतन करण्याकरिता काँग्रेसकडून कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात येणार आहे. असे असले, तरी वास्तव स्वीकारून नव्या दमाने पुढे जाण्यासाठी काँग्रेस निश्चित काही कार्यक्रम हातात घेणार का, याबाबत प्रश्नचिन्हच असेल. खेळ असो वा राजकारण. त्यामध्ये कुणाला ना कुणाला हार आणि जीत ही स्वीकारावीच लागते. परंतु, लढण्याऐवजी हाराकिरी करण्यातच एखादा पक्ष धन्यता मानत असेल, तर निश्चितच ती चिंतेची बाब ठरते. आज काँग्रेसबद्दल तसेच म्हणता येईल. जवळपास 60 वर्षे या पक्षाने देशाची कमान सांभाळली. हे पाहता हीच का ती काँग्रेस, असा प्रश्न कुणालाही पडावा. पाच राज्यांचा विचार करता 690 जागांपैकी या पक्षाला केवळ 55 जागांवर विजय प्राप्त करता आला. तर उत्तर प्रदेशसारख्या महाकाय राज्यात 403 पैकी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. याबाबी हा पक्ष किती रसातळाला चाललाय, हेच दर्शवत असून, यातून गांधी घराण्याच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. 2014 मध्ये देशात सत्तापरिवर्तन झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत देशभरात अनेक निवडणुका झाल्या. तथापि, या निवडणुकांमध्ये नेतृत्व म्हणून उभे राहण्याची जिगर गांधी कुटुंबीयांनी कितपत दाखविली, हा प्रश्नच आहे. तसा धांडोळा घेतला, तर निराशाच पदरी येते. यूपीच्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी ‘लडकी हूँ, लड सकती हूँ,’ असा नारा देत जरूर सज्जता दाखविली. मात्र, तोपर्यंत बराच उशिरा झाला होता. अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका मैदानात उतरतात, महिला कार्ड पुढे करतात, हे सारेच अनाकलनीय होय. मुळात राजकारण हा पार्टटाईम काम करण्याचा विषय नाही. त्यात पूर्णपणे उतरावे लागते. राहुल असतील वा प्रियांका. ते झोकून काम करताना दिसत नाहीत. निवडणुका आल्या, की काही दौरे करायचे, कुठेतरी भाषण ठोकायचे, इतपतच त्यांचे राजकारण सीमित असल्याचे पहायला मिळते. प्रकृतीच्या कारणास्तव पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी या अलीकडे फारशा सक्रिय नसतात. अशा वेळी या दोन भावंडांनी ताकदीने पक्षाची कमान सांभाळण्याचे धाडस दाखविणे अपेक्षित होते. परंतु, ती इच्छाशक्तीच नाही का, की काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून काही अडचणी आहेत, हे कळायला मार्ग नाही. दोन वर्षांपूर्वी जी 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना परखड पत्र लिहित खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसला सक्रिय अध्यक्ष मिळावा आणि संघटनात्मक पातळीवर मोठय़ा प्रमाणावर बदल करावा, यांसारख्या मागण्यांमुळे या लेटरबॉम्बचा आवाज सर्वदूर पोहोचला. किंबहुना, नेतृत्वाला तो ऐकायला गेला नाही, हे दुर्दैवच. वास्तविक, या पत्रातून तसेच जी 23 नेत्यांनी वेळोवेळी प्रकट केलेल्या सूचना व नाराजीतून बोध घेत काँगेसने नेतृत्वाचा प्रश्न सोडविणे आवश्यक होते. मात्र, कालहरणातच नेतृत्वाने धन्यता मानली. आपण स्वतःही नेतृत्व करायचे नाही व दुसऱयालाही संधी द्यायची नाही, असाच हा सारा प्रकार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस काँग्रेस क्षीण होताना पहायला मिळत आहे. म्हणूनच आता का होईना गांधी कुटुंबीयांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्याचबरोबर नेतृत्वाचा प्रश्नही एकदाचा मिटवायला हवा. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता बदल अनिवार्य असल्याचे मत पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे. हे मत अत्यंत वास्तववादी ठरावे. काँग्रेसला आता बदलण्याशिवाय पर्याय नाही. पक्षात नवनवीन नेतृत्व तयार व्हायला हवे. त्या दृष्टीने आगामी कार्यकारिणीत काही चर्चा होणार असेल, तरच त्याला अर्थ असेल. या बैठकीत नेतृत्व बदल तसेच संघटनात्मक फेरबदलाबाबतचा विषय जी 23 नेत्यांकडून पुन्हा छेडला जाण्याची चिन्हे आहेत. तशी गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, भूपिंदरसिंह हुड्डा आदी नेत्यांची पराभवानंतर अलीकडच बैठक झाली होती. कार्यकारिणीत या मंडळींकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात येत असतील, तर त्याकडे खिलाडूवृत्तीने पहायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी नेतृत्वावर त्या त्या वेळी विश्वासही दाखविला आहे. मात्र, आता पक्षात नेतृत्वाचा प्रश्नच अधांतरी ठेवण्यात येत असेल नि त्यावर ही मंडळी चिंता व्यक्त करीत असतील, तर त्याची दखल घेण्यातच शहाणपणा होय. चढ-उतार, फॉर्म-बॅडपॅच यातून प्रत्येक पक्षाला आज ना उद्या जावे लागते, यात कोणतीही शंका नाही. मात्र, आत्मपरीक्षणच करायचे नसेल, तर सुधारण्याचा मार्गच खंडित होतो. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना बैठकीतून काही निष्पन्न होईल, याविषयी साशंकता वाटणे, यातूनच काँग्रेस नेतृत्वाच्या सुस्तावलेपणावर शिक्कामोर्तब होते. पंजाबसारखे हक्काचे राज्य काँगेसने केवळ अंतर्गत मतभेदांमुळे घालवले. आता राजस्थान व छत्तीसगड ही दोनच राज्ये पक्षाच्या ताब्यात आहेत. तेथेही अधूनमधून कुरबुरी सुरू असतात. पुढच्या वर्षभरात गुजरात, कर्नाटकसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होतील. लोकसभा निवडणुकीलाही अवघी दोन वर्षे उरली आहेत. गलितगात्र काँगेस या सर्व आव्हानांना कसे तोंड देणार, लढण्याची जिद्द दाखविणार का, याचे उत्तर पक्षाला कृतीतून द्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीने जवळपास अर्ध्या अधिक भारतात कमळ फुलविले आहे. मोदी यांची लोकप्रियता, शहा यांची रणनीती यामुळे दिवसागणिक काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक बिकट बनत चालला आहे. म्हणूनच पक्षाच्या भवितव्याकरिता काँग्रेसला सर्वप्रथम आपल्यामध्ये लढण्याची वृत्ती जागवावी लागेल. त्या अर्थी काँग्रेसची पहिली लढाई ही स्वतःशीच असेल. अंतर्गत मतभेद मिटवत, निश्चित कार्यक्रम देत पक्षाला पुन्हा लोकांमध्ये जावे लागेल.
Previous Articleजॅकलीन फर्नांडिसला होतेय थेरपीची मदत
Next Article ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात धावांचा डोंगर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.