अध्याय अकरावा
विदेही सत्पुरुष देहाचे व्यवहार कसे पार पाडतात याबद्दल भगवंत या अध्यायात उद्धवाला सविस्तर सांगत आहेत. ते म्हणाले, मनुष्याला स्वतःच्या देहाचा फार अभिमान वाटत असतो. माया त्रिगुणांची निर्मिती करते आणि माणसाला त्यांच्या तालावर नाचायला लावते. जो ज्याचा तीव्र ध्यास घेऊन मरण पावतो, त्याच रूपाने पुनर्जन्म घेऊन येतो. उद्ववा! विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत. त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणाऱया आहेत. जो बंधनात असतो तो देही असतो. तर मुक्त असतो तो विदेही असतो. ज्याप्रमाणे सावली स्वतः कोणतीही हालचाल करू शकत नाही त्याप्रमाणे मायेलाही स्वतःचे सामर्थ्य नाही. मायेचा नियंता मीच असून मीच मोक्षदाता आहे. मीच जीवाचे बंधन तोडून सायुज्यता देतो. सद्गुरु हे माझेच रूप असतात. श्रुतीचा अर्थही स्वतः मीच आणि शमदमादिक जे साधन आहे तेही मीच आहे. शिष्याच्या बुद्धीला जे ज्ञान होते तेही माझेच रूप आहे. मोक्षाचा परिपाक असलेली समाधीही मीच होय. समाधीतील समाधीसुखही मीच आहे. सनातन ब्रह्म, परिपूर्ण परमात्मा असा मी कृपाळूपणाने भक्तांना भवपाशातून मुक्त करतो.
एवढे बोलून जगजेठी श्रीकृष्णांनी उद्धवाची पाठ थोपटली आणि म्हणाले, ही अतिशय गुह्यातील गुह्य गोष्ट आहे. तुझ्यावर कृपा आहे म्हणूनच तुला सांगतो आहे. पाठ थोपटण्याच्या निमित्ताने भगवंतांनी त्यांची शक्ती उद्धवाच्या अंगात घातली आणि त्यायोगाने उद्धवाच्या अंतःकरणात अद्वैत ज्ञानाचे लक्षण प्रगट केले.
पुढे म्हणाले, उद्धवा! ज्याप्रमाणे दिवे पुष्कळ असले तरी प्रकाश वेगवेगळा नसून एकच असतो, त्याप्रमाणे त्रिभुवनामध्ये आत्मा हा एकच आहे. दोन दिव्यांच्या ज्योती एक होऊ शकतात पण दोन पणत्या काही एक व्हावयाच्या नाहीत. शरीरे स्थूल असल्याने एक होऊ शकत नसली तरी दोघांचा आत्मा मात्र एकच असतो. चंदनाचे तुकडे पुष्कळ असतात पण त्या सर्वामध्ये सुवास एकच असतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या रूपाने मी एकच अविनाश परमात्मा सर्वांच्यात वसत असतो. उद्धवाने विचारले की आता आत्म्याच्या रूपाने तूच शरीरात असतोस हे बोलणे खरे मानले तर संसारपाशादि जे बंधन आहे ते तुला लागतच असेल ना? भगवंत म्हणाले असे कधी होत नाही. ज्याप्रमाणे शरीर चालविणारा प्राण असतो, पण त्याला काही शरीराच्या अवस्था येत नाहीत त्याप्रमाणे आत्म्यालाही शरीराच्या अवस्था लागू होत नाहीत. माठात जी मोकळी जागा असते त्याला ‘घटाकाश’ असे म्हणतात. पण तो घट फुटून गेला तरी त्या मोकळय़ा जागेचा काही नाश होत नाही, त्याप्रमाणेच मीही आत्म्यामध्ये अविनाशरूपाने असतो. तलाव, विहिरी, ठिकठिकाणची डबकी यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण आकाशात पाहिले तर सूर्याची रूपे काही तितकी नसतात. ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब असते. त्याप्रमाणे एकाला अनेकत्व देणारे जे जीवत्व, ते मिथ्या आहे हे लक्षात ठेव, भागवतातील मुख्य तत्त्व आणि ज्ञानाचे शुद्ध सत्त्व ते हेच. जीवाची बद्धता किंवा मुक्तता मला परमात्म्याला मुळीच लागू होत नाही. बद्ध आणि मुक्त या अवस्था शरीराला लागू आहेत. जो त्याची यातून सुटका करून घेतो तो मला येऊन मिळतो. एक उदाहरण देतो. समजा हजार घागरींमध्ये पाणी भरले तर एकच सूर्य त्या घागरींमध्ये हजार रूपांनी दिसतो पण एका घागरीची अवस्था काही दुसऱया घागरीला लागू पडत नाही. त्यातल्याच एखाद्या घागरीला दैवयोगाने लहानसे भोक पडले, तर त्या घागरीतील पाणी गळून जाऊन तीत पडलेले प्रतिबिंबही आपल्या मूळच्या बिंबात मिळून जाते आणि बाकीची प्रतिबिंबे जशीच्या तशीच असतात. त्याप्रमाणे गुरुकृपेचा उदय झाला असता ज्याचा सूक्ष्म देह विरून जातो, त्याचे परमात्म्याशी ऐक्मय घडते आणि बाकीचे बिचारे देहाच्या बंदिखान्यात पडून राहतात. तू माझा प्रिय शिष्य असल्याने भागवतातील मुख्य तत्त्व आणि सार विशद करून सांगणारे हे निरूपण पुढे मोठय़ा आनंदाने, आवडीने व चांगली फोड करून उद्धवा मी तुला सांगणार आहे.
क्रमशः