कोरोना स्थितीमुळे जल्लोष टाळला, पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांचे उत्साहवर्धन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने आपला 41 वा स्थापना दिन मंगळवारी गांभीर्यपूर्वक रितीने साजरा केला आहे. देश कोरोनाच्या नव्या लाटेशी दोन हात करत असल्याने हा दिवस जल्लोष न करता मानण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनानिमित्त देशभरातील भाजपच्या लक्षावधी कार्यकर्त्यांशी हितगुज केले.
6 एप्रिल 1980 या दिवशी दिल्लीत भाजपची स्थापना दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी तसेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. भाजपचा मूळ पक्ष जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला होता. नंतर 1980 मध्ये जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भाजपची स्थापना केली. त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. नंतरच्या 34 वर्षांच्या काळात या पक्षाने लोकसभेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमत मिळविण्यापर्यंत झेप घेतली. भारतातील इतर सर्व राष्ट्रीय पक्ष याच कालावधीत आकुंचन पावत असताना भाजपचा मात्र उत्तरोत्तर विस्तार होत राहिला. पंतप्रधान पदी विराजमान झालेले भाजपचे प्रथम नेते अटलबिहारी वाजपेयी होते. नंतर हे पद विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोनदा मिळविले आहे.
कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास बाळगावा
41 व्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. त्यांनी भाजपच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. पक्षाचा विस्तार आणि प्रगती हे लक्षावधी कार्यकर्त्यांच्या श्रमाचे आणि निर्धाराचे फलित आहे. हाच निर्धार आणि आत्मविश्वास त्यांनी कायम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक राष्ट्रकार्यात भाजपचा कार्यकर्ता आघाडीवर राहिला आहे. यापुढेही तो असाच अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांचा समाचार
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नवे कृषी कायदे यांच्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून विरोधक देशात राजकीय अस्थिरता निर्माण करू पहात आहेत. मात्र त्यांचे देशविघातक डावपेच यशस्वी होणार नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेचे पक्षाच्या धोरणांविषयी प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी विनाकारण आणि हेतुपुरस्सर संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावध आणि सजग रहावे. खोटारडेपणाच्या आधारावर भ्रम फैलावणाऱया विरोधकांशी दोन हात करण्यात कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आघाडीवर रहावे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
‘भाजप निवडणूक जिंकणारे यंत्र नव्हे’
भारतीय जनता पक्षाने कोणतीही निवडणूक जिंकली की त्याला निवडणूक जिंकणारे यंत्र असे उपहासाने म्हटले जाते. इतर पक्षांनी निवडणूक जिंकली की मात्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. हा पक्षपात आपण नेहमी सहन केला आहे. तथापि, भाजप हे निवडणूक जिंकणारे यंत्र नसून माणसे जोडणारी व्यवस्था आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.