पंतप्रधान मोदी यांनी पेले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन : पक्षाची प्रगती थक्क करणारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचा 43 वा स्थापना दिन बुधवारी देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजप मुख्यालय आणि विविध राज्यांमधील पक्षाच्या कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाने या कालावधीत केलेली प्रगती अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सध्या देशात दोन प्रकारचे राजकारण होत आहे. एक प्रकार ‘परिवार भक्ती’चा तर दुसरा ‘राष्ट्रभक्ती’चा आहे. नुकताच भाजपने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवून ही राज्ये स्वतःकडे राखली आहेत. तसेच राज्यसभेत गेल्या 3 दशकांमध्ये 100 खासदारांचा टप्पा गाठणारा भाजप हा प्रथम पक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला हा स्थापना दिवस विशेष महत्त्वाचा आहे. जनसंघाच्या ‘पणती’पासून भाजपच्या ‘कमळा’पर्यंत झालेला हा प्रवास अविस्मरणीय आहे. या प्रगतीसाठी कार्यकर्त्यांच्या 4 पिढय़ांनी योगदान दिले असून त्यामुळेच हा देदिप्यमान आणि वैभवी काळ आपण अनुभवत आहोत. हे श्रेय कार्यकर्त्यांचे आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशभक्तीपूर्ण राजकारण
एक काळ असा होता की, कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी आपले प्रश्न सुटणार नाहीत, अशी लोकभावना होती. लोकांना नैराश्येने घेरले होते. तथापि, आज देशात मोठे परिवर्तन घडले असून प्रत्येक नागरिकाला याचा यथार्थ अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या हितासाठी निर्धाराने उभा राहिलेला निर्भय देश, अशी भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची भूमिका नगण्य होती. मात्र, आता ही स्थितीही राहिली नसून सध्या होत असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात भारताने हस्तक्षेप करावा, अशी जगातील अनेक मोठय़ा देशांच्या नेत्यांची अपेक्षा आहे. भारताचे महत्त्व किती वाढले आहे, हे यावरून दिसून येते. देशाची आणि पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत रहावी, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे मोदींनी सांगितले.
नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन भाषणापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते मुख्यालयावर पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. त्याचप्रमाणे भाजपचा मातृपक्ष असणाऱया जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, कोरोना परिस्थिती लक्षात घेता मुख्यालयात मोठय़ा प्रमाणावर संमारंभ साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘2 ते 303’ ः भाजपचा कालक्रम
ड 1951 मध्ये जनसंघाची स्थापना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि इतर नेत्यांनी केली. मात्र, त्यानंतरच्या अनेक निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नाही. 1967 च्या लोकसभा निवडणुकीत बऱयापैकी यश मिळाले होते.
ड 1977 मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन करण्यात आला. त्याचवर्षी आणीबाणीच्या कालखंडानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा विजय होऊन प्रथमच भारतात विरोधी पक्ष सत्तेवर आला होता.
ड 1980 मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून अलटबिहारी वाजपेयी आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यामुळे जनसंघ हा भाजपचा मातृपक्ष म्हणून ओळखला जात आहे.
ड 1984 मध्ये भाजपने प्रथमच स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढविली. मात्र, केवळ 2 जागा निवडून आल्या. त्यानंतर शहाबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन इत्यादी मुद्दय़ांमुळे भाजपला मोठे बळ मिळाले.
ड 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रथम काँगेसला मागे टाकून लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळविला. त्यानंतर पक्षाची प्रत्येक निवडणुकीत सदस्य संख्या जास्त जास्त होत गेली.
ड 1996 या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात 13 दिवसांचे सरकार स्थापन केले. मात्र, अन्य कोणी पाठिंबा न दिल्याने ते अल्पजीवी ठरून राजीनामा द्यावा लागला.
ड 1998 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 183 जागा मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. अन्य पक्षांच्या साहाय्याने वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले होते.
ड त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. या सरकारने मात्र आपला जवळपास कार्यकाळ पूर्ण केला. पण, 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये पक्षाला पराभव पचवावा लागला.
ड 2013 मध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सूत्रे देण्यात आली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर पूर्ण बहुमताचे सरकार स्थापित केले.