बेंगळूर/प्रतिनिधी
मंत्रिमंडळ विस्तारामुळे कर्नाटक राज्य भाजप मधील काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे येडियुरप्पा यांना पक्षातील आमदाराच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता १५ आमदार येडियुरप्पा सरकारविरोधात बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज झालेले आमदार एकमेकांच्या संपर्कात असून, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचं वृत्त आहे. याआधी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही तक्रारी असल्याचं दिल्लीला जाऊन करा अशा स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यामुळे नाराज आमदारांचा गट दिल्लीत वरिष्ठांना भेटणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा १३ जानेवारी रोजी विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारावेळी ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, या विस्तारावर भाजपच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे लोक सातत्यानं सत्तेत आहेत, त्यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्या चुकीच्या आहेत.
राज्य सरकारनं वरिष्ठ मंत्र्यांना आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावं आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. हे नवीन चेहरे पुढील दशकभर पक्षाची बांधणी करण्याचं काम करू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना भाजपाचे आमदार शिवानगौडा नायक यांनी जे मंत्री २० महिन्यांपासून मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आता बाजूला कराव आणि नवीन चेहऱ्यांना घेण्यात यावी. वरिष्ठ मंत्र्यांनीही पक्षासाठी काम करायला हवं आणि २०२३ च्या निवडणुकीसाठी रणनिती तयार करायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
नाराज भाजप आमदार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांकडून भेटीसाठी वेळ मागण्यात आल्याचंही वृत्त असून, राष्ट्रीय नेतृत्व या आमदारांच्या मागण्यांची दखल घेणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.