कोलकाता / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा की नाही, तसेच 7 मार्चला कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासभेला उपस्थित रहायचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी सौरव गांगुलीनेच घ्यायचा आहे, असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी केले आहे. ते यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
7 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांची महासभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली उपस्थित राहतील. ते याचवेळी भाजपमध्ये प्रवेशही करू शकतात, असे वृत्त गेले दोन दिवस प्रसारित होत आहे. त्यासंबंधी भाजपच्या वतीने शमिक भट्टाचार्य स्पष्टीकरण देत होते.
अनेक महिन्यांपासून चर्चा
सौरव गांगुलींच्या भाजप प्रवेशासंबंधीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. जानेवारीमध्ये गांगुली यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी दोनवेळा करण्यात आली. सध्या ते त्यांच्या घरी विश्रांती घेत आहेत. भाजपला या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यासंबंधी कोणतीही आग्रही भूमिका घेतलेली नाही. त्यांची इच्छा असेल आणि त्यांच्या प्रकृतीची स्थिती अनुकूल असेल, तसेच त्यांनी स्वतःहून महासभेला उपस्थित राहण्याच, तसेच भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे मनःपूर्वक स्वागत करू. राज्यातील जनतेलाही आनंद होईल. मात्र, स्वतः गांगुली यांच्याकडून आतापर्यंत आम्हाला तशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी या विषयावर आम्ही काही सांगू शकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.