सांखळीत मुख्यमंत्र्यांचा पराभव निश्चित : काँग्रेसचे नाना पटोले यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
भाजपने गोमंतकीय जनतेला फसविले असून आता जनताच भाजपला घरचा रस्ता दाखवेल व पराभूत करेल, असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपमचे पितळ आता उघडे पडले असून जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार असून मतदारांनी आता भाजपचा पराभव करून काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री सांखळीत पराभूत होतील, आणि काँग्रेस सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपने प्रत्येक क्षेत्रात राज्यातील लोकांचा विश्वासघात केलेला असून, कोविड काळांत लोकांचा प्राण काडून घेतला, यासाठी या पक्षाला लोक पराभूत करणार आहेत. बुधवारी पणजीत पत्रकार परिषद घेवून भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर उघड झाला आहे, असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर, एआयसीसीचे निरीक्षक मनोज त्यागी, ऍड. श्रीनिवास खलप, तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.
भाजपने राज्यातील खनिज व्यवसाय बंद केल्याचा आरोप त्यांनी केला. पणजीची जागाही काँग्रेसच जिंकेल. आम्ही उदय मडकईकर यांना भेटलो आहे आणि आम्हाला विश्वास आहेत ते आमच्यासोबत राहणार आहे. पणजीशिवाय शेजारच्या मतदारसंघातही ते आम्हाला मदत करतील, असे पटोले म्हणाले.
जनता भाजपवर नाराज
आपण साखळी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी घरोघरी फिरलो आहे. जनता भाजपवर नाराज आहे आणि त्यांचा पराभव नक्की करणार आहे. लोक मला सांगत होते की मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, ज्यांच्याकडे राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात एकच वॅगन-आर गाडी होती. त्यांनी संपत्ती कशी मिळवली हे लोकांना माहीत आहे आणि भाजपविरोधातील हा राग त्यांना घरी पाठवेल, असे ते म्हणाले.