आपच्या उमेदवारांकडून एकनिष्ठतेची लेखी हमी : गोव्याच्या राजकीय इतिहासातील पहिलाच अभिनव प्रयोग,मतदारांसमोर उमेदवार होणार शपथबद्ध
प्रतिनिधी /पणजी
आतापर्यंत गोमंतकीयांना विविध मोफत योजना आणि अन्य सुखसुविधा देण्याची हमी देणाऱया आम आदमी पक्षाने बुधवारी स्वतःच्या प्रत्येक उमेदवाराकडून एकनिष्ठतेची हमी घेतली. अशाप्रकारे स्वतःच्या उमेदवाराकडून लेखी हमीपत्र घेण्याचा गोव्याच्या राजकीय इतिहासातील हा पहिलाच अभिनव प्रयोग ठरला आहे. या हमीपत्रामुळे आपचे उमेदवार भ्रष्टाचार करणार नाहीत, अन्य पक्षात जाणार नाहीत व एकसंध राहतील याची ग्वाही मतदारांना मिळाली आहे.
चार दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्येक उमेदवार हमीपत्रानुसार जाहिररित्या शपथबद्ध झाला. दिल्लीच्या आमदार आतिशी, ऍड. अमित पालेकर, राज्य संयोजक राहूल म्हांब्रे यांच्यासह अन्य उमेदवार व पक्षपदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसने भाजपाला मदतच केली
गोव्यात गत काही वर्षांपासून राजकीय अस्थिरता आणि फुटीरता, पक्षांतरे यांना ऊत आला आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर तर काँग्रेस पक्षाने जो काही पायंडा घातला, त्यामुळे गोव्याची जगभरात नाचक्की झाली. जनतेने तब्बल 17 आमदारांना कौल देऊनही काँग्रेसने स्वतः सरकार न घडवता भाजपला मदत केली. त्यांचे एकमागून एक तब्बल 15 आमदार भाजपात सामील झाले. त्यामुळे जनतेने नाकारले असतानाही भाजपलाच सत्तास्थानी राहण्याची संधी प्राप्त झाली, असे केजरीवाल म्हणाले.
आमदारांना एकसंध ठेवणे, चिंतेचा विषय
कायद्यातील पळवाटा आणि न्यायव्यवस्थेतील संथपणा यांचा फायदा घेत आमदार पक्षांतरे करतात आणि सदर बेकायदा कृत्याचा निवाडा होईपर्यंत सहजपणे स्वतःचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात, याची अनेक उदाहरणे आजवर गोमंतकीयांनी अनुभवली आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आमदारांना एकसंध ठेवताना अन्य पक्षात जाण्यापासून कसे रोखावे, हा गहन चिंतेचा विषय प्रत्येक राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सतावत होता. त्यावर आम आदमी पक्षाने आपल्या पद्धतीने उपाय शोधण्याचे प्रयत्न केले असून त्याचाच भाग म्हणून प्रत्येक उमेदवाराकडून स्वतंत्र घोषणापत्र लिहून घेतले आहे.
परमेश्वरास साक्षी मानून शपथ
पक्षातर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले ऍड. अमित पालेकर यांनी स्वतःही हमीपत्राचे वाचन करताना प्रत्येक उमेदवाराकडून हमी घेतली. त्यानुसार, ’मतदारसंघातील लोकांनी आमदार म्हणून निवड केल्यास, ’कधीच लाच घेणार नाही. आप सोडून अन्य पक्षात जाणार नाही’, अशी शपथ परमेश्वरास साक्षी ठेऊन प्रत्येक उमेदवाराने घेतली. त्याचबरोबर ’मतदारसंघातील लोकांची मनःपूर्वक सेवा करेन व दिलेले आश्वासन पाळीन. अन्यथा मतदारांनी आपणावर कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच कुणाच्याही दबावाखाली न येता, स्वेच्छेने आणि अक्कलहुशारीने आपण हे हमीपत्र लिहून देत आहे’, असे वचनही प्रत्येक उमेदवाराने यावेळी दिले.
दरम्यान, तत्पूर्वी बोलताना श्री. केजरीवाल यांनी गोव्याच्या राजकारणात अमर्याद भ्रष्टाचार आणि फुटीरतावाद या दोन प्रमुख समस्या असल्याचे सांगितले. भ्रष्टाचारामुळे सर्व पैसा चोरीस जातो. एका पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झालेला उमेदवार मतदारांशी प्रतारणा करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो. हे सर्व कुठेतरी थांबण्याची गरज आहे. मतदारांचा विश्वासघात करणाऱया, त्यांच्या मतांची सौदेबाजी करणाऱयांवर कुठेतरी वचक बसणे गरजेचे आहे. याच विचारातून ’आप’ने प्रत्येक उमेदवाराकडून लेखी वचननामा, हमीपत्र लिहून घेतले आहे, असे केजरीवाल म्हणाले.
एखादा उमेदवार केवळ प्रामाणिक असून चालत नाही, तर त्यांच्याबद्दल मतदारांच्याही मनात विश्वास, आदर निर्माण झाला पाहिजे, म्हणुनच आम्ही हे हमीपत्र घेतले आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.