गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई : जनतेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज
प्रतिनिधी /सातारा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. महाराष्ट्रातील नागरिक व महिलांची सुरक्षा करण्यास पोलीस दल नेहमीच सज्ज असते. महिलांवर अत्याचार होवू नयेत यासाठी शासन सक्त आहे. मात्र, सध्या भाजपवाल्यांकडे काहीच काम नसल्याने त्यांना फक्त टीका करण्याचा उद्योग करावा लागत आहे. चित्रा वाघ यांना सातारा जिल्हय़ाचा पालकमंत्री कोण आहे ? धुमाळ प्रकरणात काय कारवाई झाली याची माहिती नाही आणि त्या बोलत आहेत हे त्यांचे अज्ञान आहे. त्यांनी माहिती घेवून बोलावे, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
गुरुवारी सकाळी भाजपच्या चित्रा वाघ यांनी साताऱयात पत्रकार परिषदेत घेवून स्वतः गृहराज्यमंत्रीच सुरक्षित नसल्याची खिल्ली उडवली होती. त्यानंतर सायंकाळी मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेवून त्यांनी जरा माहिती घेवून बोलायला हवे, असा सल्ला दिला.
सातारा जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस चोखपणे करत आहेत. माझ्यावर पाळत ठेवणाऱयांच्या विषयाबाबत यांनी मी सुरक्षित नसल्याचे केलेले विधान बालीशपणाचे आहे. पाळत ठेवणे आणि सुरक्षित नसणे यातील फरक त्यांना कळत नाही. मंत्री म्हणून काम करत असताना अनेकविध पैलूंशी संबंध येत असतो. माझ्याबाबत पाळत असल्याच्या संशयावर अनोळखींची चौकशी सुरु असून त्यातील काही गोष्टी सध्या जाहीरपणे सांगायच्या नाहीत. मात्र, वेळ येताच त्याबाबतही सांगण्यात येईल त्याचा पोलीस तपास सुरु आहे.
गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असताना गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनसह यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये देखील 20 ते 25 जिल्हय़ांना भेटी दिल्या आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस करत असलेले प्रयत्न, त्यांच्या अडचणीही समजावून घेतल्या आहेत. पोलीस दलाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून राज्यातील ठाकरे सरकार व त्यातील सर्व मंत्री देखील योग्य पध्दतीने काम करुन जनतेला न्याय देण्याचे काम करत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्हय़ात गत दोन वर्षांची आकडेवारी पाहता 2020 मध्ये महिलांवर अन्याय, अत्याचारच्या घटना 47 एवढय़ा संख्येने कमी झालेल्या आहेत. ज्या महिलांना अशा प्रकारास समोर जावे लागते अशा आरोपींवर पोलीस दलाकडून कडक कारवाई झालेली आहे. तर गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ प्रकरणात देखील संबंधित शिक्षिकेच्या तक्रारीनंतर त्यांना अटक झालेली आहे. पोलीस कारवाई करत नसल्याची टीका वाघ यांनी माहिती न घेता केली आहे. त्यांनी माहिती घेवून बोलले पाहिजे, असेही मंत्री देसाई यावेळी म्हणाले.
कराडात कोरोना नियमांचा भंग पत्रकार परिषदेत कृष्णा कारखान्याच्या निकालानंतर कराड शहर व परिसरात गुलालाची उधळण करत मोठा जमाव जमला होता. त्यावेळी तिथे कोरोना संसर्गातील नियमांची पार धुळधाण उडाली. याबाबतचा व्हिडिओ मंत्री देसाई यांनी दाखवला असता ते म्हणाले, हा विधानसभेच्या निवडणुकीतील वाटतोय. मात्र, नंतर त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवा मी चौकशीचे आदेश देवून कराड डीवायएसपींना कारवाई करण्यास सांगतो, असे सांगितले.