पणजी मनपा प्रभाग फेररचनेत प्रचंड गोंधळ,विनाकारण वॉर्डांची फोडाफोड केल्याचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
पणजी मनपाची प्रभाग फेररचना आणि राखिवतेवरून भाजपसह अन्य विरोधी नगरसेवकातही प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे. या फेररचनेमुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. अन्य एखाद्या प्रभागातून स्वतः किंवा पत्नीमार्फत नशीब आजमावयाचे म्हटले तरीही राखिवतेमुळे त्यांची गोची झाली आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग ओबीसी किंवा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरली आहे.
ताळगावातील भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत आपले तमाम कार्यकर्ते दुखावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेररचनेवर आपण खूश किंवा समाधानी होण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र या फेररचनेसाठी आपण कुणालाच दोषी धरत नाही, असे त्यांनी सांगितले. प्रभाग विस्कळीत झाल्याने आपले कार्यकर्ते दुखावले आहेत. मतदारयादी हाती पडल्याशिवाय काहीच सांगू शकत नाहे. पुढील आठ दिवसात आपले धोरण नक्की होईल, असेही ते म्हणाले.
हे बाबूशचेच कारस्थान : फुर्तादो
मनपाच्या प्रभागांची करण्यात आलेली फेररचना आणि राखिवता पाहता पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचेच हे कारस्थान असल्याचा आरोप माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केला आहे. आपल्या मिरामार प्रभागाची तब्बल चार प्रभागात फोडणी करून आपला पत्ता कट करण्याचे प्रयत्न खुद्द आमदार बाबूश यांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. ज्या बाबूशला आपण दोन निवडणुकीत पाठिंबा दिला त्यांनीच आपणाला दगा दिला. परंतु ’प्रत्येक दिवस हा रविवार नसतो’, याचे त्यांनी स्मरण ठेवावे, असा इशाराही फुर्तादो यांनी दिला आहे. प्रभाग फेररचना पाहून आपणाला धक्का बसला, असे सांगताना, ज्याप्रकारे आपला मिरामार प्रभाग विस्कटून टाकण्यात आला आहे, ते पाहता बाबूश स्वतःच्या सावलीलाही घाबरत आहेत, हेच दिसून येते, अशी परखड प्रतिक्रिया फुर्तादो यांनी दिली.
आपणावर नाहक आरोप : बाबूश
आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत फेररचना किंवा राखिवतेच्या प्रकारात आपला काहीच हात नसल्याचे म्हटले आहे. सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाने केली आहे. तरीही काही लोक आपणावर नाहक आरोप करतात ते चुकीचे आहे. परंतु आपणाला काहीच फरक पडत नाही, कारण सर्व मतदार आपलेच आहेत. आम्ही सर्व प्रभागातून निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे कोणता प्रभाग राखीव आहे, कोणता खुला आहे याची माहिती मिळविणे हे कर्तव्य आहे. त्यानुसार आम्ही उमेदवारांची निवड करणार असून पक्षाचा सल्ला घेऊनच आपण पुढे जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
या प्रकाराने नाराज बनलेल्या भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यासंबंधी माहिती देताना त्यांनी, राखिवता किंवा फेररचना या गोष्टी पक्षपातळीवर होत नसतात. ती प्रक्रिया पालिका संचालनालयातर्फे होत असते. राखिवता किंवा फेररचनेमुळे सगळेच काही 100 टक्के समाधानी होतील असे नसते. ज्यांचा फायदा होणार असतो ते सांगायला येत नाहीत, ज्यांचे नुकसान होणार असते ते तक्रारी घेऊन येतात. तरीही फेररचना जाहीर झाल्यापासून आपण सर्वांनाच भेटत आहे, त्यांचे समाधान करत आहे, असे तानावडे म्हणाले.
वॉर्ड आरक्षण चुकीच्या निकषावर आधारित ,जातीय आरक्षण लोकसंख्येच्या निकषावर हवे
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची टीका
वॉर्डचे आरक्षण हे संबंधित जाती – जमातीच्या लोकसंख्येच्या निकषावर असायला हवे परंतु आयोगाने ते मतदारांच्या चुकीच्या निकषावर आधारित केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. या प्रकरणी सर्व पालिकांमधील काँग्रेसचे नगरसेवक न्यायालयात जाऊन दाद मागणार, अशी माहिती कामत यांनी दिली आणि एकच निकष सर्व पालिकांमध्ये आरक्षणासाठी न लावता वेगवेगळा निकष लावण्यात आल्याचे निदर्शनास आणले.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिगंबर कामत म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्डांचे आरक्षण हे मर्जीनुसार करण्यात आले आहे आणि ते अन्यायकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून ते संतापले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सोयीस्कर असे आरक्षण करण्यात आले असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. निकष कोणताही ठरवला तरी तो सर्व नगरपालिका वॉर्डांसाठी समान असायला हवा परंतु आताचे पाहता तो समान नाही तर विषम आहे. त्यामुळे सध्या नगरसेवक असलेल्या उमेदवारांमध्ये खळबळ माजली असून ते न्यायालयात दाद मागणार असल्याचे कामत यांनी नमूद केले.