सुदिन ढवळीकर यांचे स्पष्टीकरण : ते विधान गोंधळात केल्याचा दावा
प्रतिनिधी /धारबांदोडा
भाजपासोबत कुठल्याही परिस्थितीत मगो पक्ष युती करणार नाही ही भुमिका यापूर्वीच आपण जाहीर केलेली आहे. मात्र प्रसार माध्यमांनी युती विषयी वारंवार विचारलेल्या प्रश्नांमुळे गोंधळलेल्या अवस्थेत आपण 12 जागा सोडल्यास भाजपा सोबत युती करू असे विधान केले. भाजपा सोडून अन्य कुठल्याही समविचारी पक्षाने 12 जागा सोडून युतीचा प्रस्ताव ठेवल्यास त्याचा विचार केला जाईल असे स्पष्टीकरण मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
कुळे येथील अवर लेडी ऑफ पायटी हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ढवळीकर यांनी भाजपा सोबत युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य विनायक उर्फ बालाजी गांवस यांनी तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिराचे ढवळीकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. कुळे येथील अवर लेडी ऑफ पायटी हायस्कूलमध्ये हे शिबिर आयोजित केले आहे. यावेळी विनायक गांवस, धारबांदोडय़ाचे पंचसदस्य परेश खुटकर, अवर लेडी ऑफ पायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक फा. कार्सन डय़ुरांडो, शिबिराचे मार्गदर्शक प्रा. आत्माराम गावकर हे उपस्थित होते.
शिक्षण हे पवित्र असून त्यावर कुणी राजकारण करू नये असे सुदिन ढवळीकर यावेळी बोलताना म्हणाले. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कची सोय करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हे सरकार देऊ शकले नाही. ऑनलाईन वर्ग सुरु करण्यापूर्वी सरकारने तशा साधन सुविधा उभारुन शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज होती. एका सर्वेक्षणानुसार देशात 56 टक्के शिक्षणावर परिणाम झाला असून त्यात गोवा 55 टक्क्यांवर आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स आयोजित केल्याबद्दल विनायक गांवस यांचे त्यांनी अभिनंदन केले.
फा. डय़ुरांडो म्हणाले, ग्रामीण भागात हुशार विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. गोव्याचे पहिले मुख्य़मंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यात शिक्षणाचा पाया घातला. खेडय़ापाडय़ात शाळा सुरु करण्यामागे त्यांची दूरदृष्टी होती. विनायक गावस म्हणाले, शिक्षणाशिवाय माणसाची व समाजाची प्रगती होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चित चांगली कामगिरी करु शकतील. या उद्देशाने हा कोर्स आयोजित केला आहे. प्रा. आत्माराम गांवकर यांनी क्रॅश कोर्स या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यशवंत बांदोडकर यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण गाड यांनी आभार मानले.