नगरसेवक सुनील काळेकर यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
भाजपाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेला पारंपारिक दहीहंडी उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दहिहंडीचे रोख पारितोषिक हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावातील नागरिकांच्या दैनंदिन गरजेसाठी उपयोग करणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे नगरसेवक सुनील काळेकर यांनी माहिती दिली.
त्यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, की सध्याचे राज्य सरकार हे हिंदूच्या सणांवर घाला घालू पहाते. याचे कारण गेल्या वर्षी कोरोनाचे कारण देवून गणेशोत्सवासाठी उभे करण्यात आलेले मंडप काढण्यास सांगितले. वास्तविक पहाता शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये छोटय़ा मंडपांना परवानगी देण्यात आली असताना देखील असा प्रकार घडला. यावरुन प्रशासनामध्ये आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. केवळ हिंदूच्या सणांना कठोर व जाचक अटी असा सरकारचा दुटप्पीपणा आता नागरिक सहन करणार नाहीत. एकीकडे राज्यात मॉल, डान्स बार खुले करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मात्र अखेर मंदिर उघडण्याकरता हे ठाकरे सरकार तयार नाहीत. यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपारिक सण उत्सव यापुढे उत्सवातच साजरे केले जातील, असा इशाराही काळेकर यांनी दिला. भाजपाच्या दहिहंडी सोहळयामध्ये खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे व विधानपरिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर हे नेते सहभागी होणार असल्याचेही काळेकर यांनी सांगितले.