प्रचाररथावरून अखिलेश यादव यांचे प्रियंका वड्रांवर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ कानपूर
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुढील वर्षी होणाऱया उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारास प्रारंभ केला आहे. मंगळवारी त्यांनी कानपूरमधून समाजवादी विजय यात्रेस सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर लखीमपूर खीरी प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका वड्रा यांच्या सक्रीयतेला लक्ष्य करत भाजप आणि काँग्रेसचा मार्ग एकच असल्याचे विधान केले आहे.
लखीमपूरमध्ये प्रियंका वड्रा सक्रीय झाल्याने समाजवादी पक्षाला निवडणुकीत कुठलेच नुकसान होणार नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये कुठलाच फरक नाही. ज्याप्रकारे कायदा चिरडण्यात आला, शेतकऱयांना चिरडले गेले, राज्यघटनेची पायमल्ली करण्यात आली, त्यामुळे जनतेत भाजपच्या विरोधात आक्रोश असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
पित्याची परंपरा, कानपूरची निवड
मुलायम सिंह यादव यांनी एकेकाळी कानपूर शहरातूनच रथयात्रेची सुरुवात केली होती. हीच परंपरा मी पुढे नेत आहे. कानपूर हे मोठे औद्योगिक शहर असल्याने महत्त्वाचे आहे. कानपूरमध्ये समाजवादी पक्षाने मोठा विकास घडवून आणला आहे. कानपूरचे बंद कारखाने सुरू होऊन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरता समाजवादी पक्ष काम करणार असल्याचे अखिलेश म्हणाले.
विजय रथाचे स्वरुप
एका मर्सिडीज बसवर अखिलेश यांचे पोस्टर एकाबाजूला तर दुसऱया बाजूला पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे पोस्टर दिसून येते. रथावर पक्षाचे नेते मोहम्मद आझम खान यांचेही छायाचित्र आहे.