पिंपरी / प्रतिनिधी :
जगामध्ये मंदी आहे. मात्र, तरीही भारतीय अर्थव्यवस्था नियंत्रित असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘कर्तव्य फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलेत होते. महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आदी उपस्थित होते.
पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था विकसित होण्याचे आपले उद्दिष्ट आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था झाल्यास रोजगार मिळेल. 2030 पर्यंत भारत विकसित राष्ट्राच्या भूमिकेत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझा स्वभाव शांत आहे. पण, अनेकांना तसे वाटत नाही. लहानपणी मी खोडय़ा करत नव्हतो. पण, खोडय़ांचा साक्षीदार असायचो. बॅटिंग केली, की मी फिल्डिंग करत नव्हतो. पळून जात होतो, अशा आठवणींना उजाळा देत ‘मी पुन्हा येईन,’ असे सांगत त्यांनी सर्वांना हास्यकल्लोळात बुडवले.
अपघातानेच राजकारणात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. वकील व्हायचे होते. महाविद्यालयात असताना अभाविपचे काम करत होतो. परिषदेचे सुनील आंबेकर यांनी पक्षात काम करण्यास सांगितले. मी तयार होत नव्हतो. मात्र, तसा निर्णय झाल्याने अपघाताने राजकारणात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.