वृत्तसंस्था/ ढाका
येथे सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत शुक्रवारी सांघिक रिकर्व्ह प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी रौप्यपदके मिळविली. महिलांच्या विभागात सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत कोरियाने भारताचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात कोरियाच्या तिरंदाजपटूंनी आपले वर्चस्व राखत सुवर्ण पटकाविले.
महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात भारताच्या तिरंदाजपटू अंकिता भक, रिद्धी फोर आणि मधू वेदवान यांची कामगिरी समाधानकारक झाली नाही. दक्षिण कोरियाच्या जंग, एजिन आणि हेजिन यांनी भारतीय तिरंदाजपटूंना एकतर्फी पराभूत केले. भारताला या क्रीडा प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात दक्षिण कोरियाच्या लिओ सेनगुयेन, जाँग आणि वू टॅक यांनी भारताच्या प्रवीण जाधव, पार्थ साळुंखे आणि कपिल यांचा 6-2 असा पराभव करत सुवर्ण पटकाविले. भारताला कांस्य पदक मिळाले. मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात भारताच्या अंकिता आणि कपिल यांनी कांस्यपदक पटकाविताना उझ्बेकिस्तानच्या तिरंदाजपटूंवर 6-0 अशी मात केली. 2021 आशिया तिरंदाजी स्पर्धेत भारताने एकूण 7 पदकांची कमाई केली.