वृत्तसंस्था/ होव्ह
इंग्लंडविरुद्ध झालेल्या महिलांच्या दुसऱया टी-20 सामन्यात भारतीय संघाने षटकांची गती न राखल्याबद्दल आयसीसीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती.
आयसीसीने दिलेल्या पत्रकानुसार, निर्धारित वेळेत भारतीय संघाने एक षटक कमी टाकल्याचे आढळून आल्याने सामनाधिकारी फिल व्हिटिकेस यांनी अहवालात नमूद केले. प्रत्येक षटकाला सामना मानधनातील 20 टक्के रकमेचा दंड करण्याची तरतूद आयसीसी नियमावलीत करण्यात आली आहे. त्यानुसार भारताला 20 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने षटकांची गती न राखल्याचे मान्य केले असून आयसीसीची कारवाईदेखील स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाची औपचारिक सुनावणी घेण्याची गरज लागली नाही. मैदानी पंच इयान ब्लॅकवेल, पॉल बाल्डविन तसेच तिसरे पंच स्यू रेडफर्न, चौथे पंच टिम रॉबिन्सन यांनी या संदर्भात अहवाल दिला होता.