प्रतिनिधी/ रत्नागिरी
मागासवर्गीयाचे पदोन्नतीमधील संविधानानिक आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द केल्यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. तरी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मागासवर्गीयांची पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण त्वरित पूर्ववत करावेत व मंडळ आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी समाजाची जनगणना करुन संख्यानुसार आरक्षण बहाल करावे, यासाठी बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बहुजन समाज पार्टीच्यावतीने राज्यव्यापी धरणे आंदोलनाअंतर्गत मंगळवारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देताना प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, जिल्हा महासचिव आनंदा कांबळे, जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे, यासीन परकार, प्रेमदास गमरे, सखाराम पवार उपस्थित होते.