ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा अहवाल : जपान अन् मालदीव सर्वात प्रामाणिक : पोलीस खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भ्रष्टाचाराप्रकरणी भारताची स्थिती अधिकच खालावल्याचे ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलच्या नव्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार आशियात भारतातच सर्वाधिक भ्रष्टाचार दिसून आला आहे. तर भारतानंतर कंबोडिया आणि इंडोनेशियाचा क्रम लागतो. स्वतःचे काम करवून घेण्यासाठी लाच दिल्याचे 39 टक्के भारतीय मान्य करतात, तर कंबोडियात हे प्रमाण 37 टक्के तर इंडोनेशियात 30 टक्के इतके
आहे.
मागील वर्षी भारत भ्रष्टाचाराप्रकरणी जगातील 198 देशांच्या यादीत 80 व्या स्थानी होता. या संस्थेने भारताला 100 पैकी 41 गुण दिले होते. तर चीनही 80 व्या स्थानी, म्यानमार 130 व्या, पाकिस्तान 120 व्या आणि नेपाळ 113 व्या, भूतान 25 व्या, बांगलादेश 146 व्या आणि श्रीलंका 93 व्या स्थानी होता.
नव्या अहवालानुसार आशियात प्रत्येक 5 पैकी एका व्यक्तीने लाच दिली आहे. भविष्यात स्थिती सुधारणार असल्याचे 62 टक्के लोकांचे मानणे आहे. याउलट आशियाच्या सर्वात प्रामाणिक देशांमध्ये मालदीव आणि जपान संयुक्तपणे अग्रस्थानी आहेत. तेथे केवळ 2 टक्के लोकांनी एखाद्या कामासाठी लाच द्यावी लागल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाचा क्रमांक लागत असून तेथे 10 टक्के लोकांना स्वतःचे काम व्हावे याकरता लाच द्यावी लागली आहे.
भारतातील बहुतांश जणांचे पोलीस आणि स्थानिक अधिकारी लाच घेण्यात सर्वात आघाडीवर असल्याचे मानणे आहे. हे प्रमाण सुमारे 46 टक्के इतके आहे. त्यानंतर देशाच्या खासदारांविषयी 42 टक्के लोकांचे असे मत आहे. सरकारी कर्मचारी आणि 20 टक्के न्यायाधीश भ्रष्ट असल्याचे 41 टक्के लोकांचे मानणे आहे.
या अहवालात देशातील भ्रष्टाचाराला विविध शेणींमध्ये विभागण्यात आले आहे. 89 टक्के भारतीयांनी शासकीय भ्रष्टाचार सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे. तर 39 टक्के लोक लाचखोरीला सर्वात मोठी समस्या मानतात, तर 46 टक्के लोक कुठल्याही गोष्टीसाठी शिफारस करण्याच्या वृत्तीला समस्या मानतात. मतासाठी नोट मोठी समस्या असल्याचे 18 टक्के लोकांचे मानणे आहे. काम व्हावे याकरता होणारे शारीरिक शोषण मोठी समस्या असल्याचे 11 टक्के लोकांनी म्हटले आहे.
आशियाई देशांमध्ये 23 टक्के लोक पोलिसांना सर्वाधिक भ्रष्ट मानतात. त्यानंतर न्यायालयांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे लोकांचे मानणे आहे. ओळखपत्रे तयार होणाऱया ठिकाणी अधिक भ्रष्टाचार होत असल्याचे 14 टक्के आशियाई लोकांचे मानणे आहे. भारतात वरिष्ठ स्तरावरील भ्रष्टाचार कमी झाला असला तरीही कनिष्ठ स्तरावर त्याचे प्रमाण कायम आहे.
भ्रष्टाचारात वाढ…
मागील एक वर्षात भ्रष्टाचार वाढल्याचे बहुतांश भारतीयांचे मत आहे. भ्रष्टाचार वाढल्याचे 47 टक्के भारतीय मानतात. तर 27 टक्के लोकांना भ्रष्टाचार कमी झाल्याचे वाटते. तर 23 टक्के लोकांना मागील वर्षात कुठलाच फरक पडला नसल्याचे वाटत आहे. तर 3 टक्के लोक याविषयी कुठलेच मत बाळगत नाहीत.