वृत्तसंस्था/ सिडनी
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये तिरंगी टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळविला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा लागेल. या तिरंगी मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ आहे.
या मालिकेत हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 5 गडय़ांनी पराभव करत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांची कामगिरी दर्जेदार झाल्याने हा सामना भारताला जिंकता आला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 147 धावांत रोखले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रित कौरने नाबाद 42 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. भारतीय संघातील पहिले चार फलंदाज शेफाली वर्मा, स्मृती मंदाना, रॉड्रिग्ज आणि हरमनप्रित कौर यांच्या कामगिरीत सातत्य दिसत असून वेदा कृष्णमूर्ती आणि तानिया भाटिया फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नव्हते. हरमनप्रित, रॉड्रिग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्याकडून सोपे झेल सुटले होते. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारतीय महिला संघाला क्षेत्ररक्षणावर अधिक भर द्यावा लागेल. विद्यमान टी-20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला या मालिकेतील इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये हार पत्करावी लागली होती. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व लेनिंगकडे सोपविण्यात आले आहे.