वरिष्ठ सेनाधिकाऱयांच्या बैठकीत सविस्तर चर्चा, सीमेवर शांततेचे उत्तरदायित्व केवळ आमचचे नाही : भारताचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लडाख मधील परिस्थिती लवकरात लवकर तणावमुक्त करावी आणि दोन्ही देशांनी आपल्या सेना पूर्वस्थितीला न्याव्यात यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी दोन्ही देशांच्या वरीष्ठ सेनाधिकाऱयांमध्ये चर्चा झाली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यत आले.
14 जुलैला दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱयांची बैठक झाली होती. त्यात पूर्व लडाख सीमेवरील संघर्षबिंदूंवरून मागे हटण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. मात्र नंतरच्या सप्ताहात चीनने पँगाँग आणि गोर्गा येथील सीमारेषांवरून माघार घेण्यास नकार दिला होता, असेही वृत्त सूत्रांनी दिले होते. तथापि, शुक्रवारच्या वृत्तानुसार संघर्ष निवळण्यासाठी पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार दोन्ही देशांच्या हालचाली होत आहेत, असे स्पष्ट करण्यात आल्याने तोडगा निघण्याची शक्यता आहे.
सावधानता कायम
चीनने आतापर्यंत अनेकदा शब्द मोडला आहे. तसेच बैठकीत ठरल्याप्रमाणे पावले उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या शब्दांवर विश्वास न ठेवता भारताने आपल्या बाजूने पूर्ण सज्जता ठेवल्याचे सांगण्यात आले. भारताने चीनच्या तोडीस तोड सेना तुकडय़ा सीमेवर नियुक्त केल्या आहेत. तसेच परिस्थिती उद्भवल्यास भूसेनेला वायुसेनेची जोडही मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे.
भारताने सीमेवर चिलखती गाडय़ा आणि रणगाडेही नियुक्त केले आहेत. तसेच सेनेला कोणत्याही प्रसंगासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सेनेला देण्यात आले असून त्यानुसार सेनेच्या हालचाली होत आहे. चीनी सेनेच्या हालचाली बारकाईने टिपण्यासाठी भारताने देशी बनावटीचे अत्याधुनिक ड्रोनही नियुक्त केले आहेत. बंगालच्या उपसागरात नौदलही सज्ज ठेवण्यात आले आहे.
भारताचे चीनला तोडीस तोड प्रत्युत्तर
सीमेवर शांतता राखण्याचे उत्तरदायित्व केवळ भारतावर नाही. ते चीनचेही आहे. त्याने त्याच्या बाजूने तणाव संपविण्याचा प्रयत्न न केल्यास भारत तसूभरही मागे हटणार नाही. चीनच्या प्रत्येक कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने चर्चेच्या गेल्या फेरीत स्पष्ट केले आहे.