नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शस्त्रसंधी कराराचे पालन कसोशीने आणि अचूकपणे करण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. नव्या समझोत्यानुसार शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता दोन्ही देश घेणार आहेत. यामुळे सीमेवर होणारी जिवीत हानी टाळली जाणार असून शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास साहाय्य होईल, असा विश्वास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या उच्च सेनाधिकाऱयांनी गेले काही दिवस या समझोत्यासंबंधी चर्चा केली होती. त्यानुसार नवे नियम बनविण्यात आले आहेत. या नियमांनुसार दोन्ही देशांमध्ये आजपर्यंत जे शस्त्रसंधी करार झाले त्यांचे पालन यापुढे काटेकोरपणे केले जाणार आहे. हे नियम 25 फेब्रुवारीपासूनच लागू करण्यात आले आहेत. 2003 मध्ये दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता. मात्र, त्याचे पालन फारच कमी वेळा करण्यात आले आहे. बहुतेकवेळा पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून भारताला स्वतःच्या संरक्षणासाठी पाकला प्रत्युत्तर द्यावे लागले आहे. मात्र हे नवे नियम पाकिस्ताकडून पाळले गेल्यास सीमेवर शांतता नांदण्यास साहाय्य होईल, अशी प्रतिक्रिया दोन्ही देशांच्या संबंधांच्या अभ्यासकांनी व्यक्त केली.