पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आत्मविश्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणू उद्रेकाच्या अनन्यसाधारण परिस्थितीमुळे लॉकडाऊन करावा लागल्याने अर्थव्यवस्थ मंदावली असली तरी भारत या परिस्थितीतूनही लवकरात लवकर भरारी घेईल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते मंगळवारी सीआयआय या संस्थेच्या वार्षिक संमेलनात बोलत होते.
नुकतेच मूडीज या संस्थेने भारताचे पतमानांकन घटविले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भाषणाकडे लक्ष दिले जात होते. सध्याच्या आव्हानाचा भारत समर्थपणे सामना करेल आणि त्यावर मात करेल. आमच्यासाठी ही एक संधी आहे. सरकार आता अधिक प्रमाणात अर्थव्यवस्थेत रचनात्मक सुधारणा करणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची दिशा बदलणार आहे. एका बाजूला कोरोनाही कडवी झुंज देत असतानाच आम्ही अर्थव्यस्थेचे योगक्षेमही योग्य रितीने सांभाळले. जनतेच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. यापुढेही रचनात्मक योजनांवर भर देऊन अर्थव्यवस्था गतीमान करण्याचा आमचा प्रयत्न सुरू राहील. आम्हाला लोकांचे जीवही वाचवायचे आहेत आणि दुसऱया बाजूला अर्थव्यवस्थाही सुस्थितीत ठेवाची असून त्यात यशस्वी होऊ असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनेक प्रभावी योजना
लॉकडाऊनच्या काळातच सरकारने अनेक प्रभावी योजना अर्थव्यवस्थेसाठी आणल्या आहेत. कोळसा क्षेत्र मुक्त करण्यात आले आहे. बिगर धोरणात्मक क्षेsत्रेही खासगी क्षेत्रासाठी मुक्त करण्यात आली आहेत. अवकाश संशोधन, अणूऊर्जा इत्यादीं क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्राला मुक्तद्वार देण्यात आले आहे. अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी निर्धार, सर्वसमावेशकता आणि पायाभूत सुविधा या तीन बाबींवर आम्ही भर देत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सामर्थ्यासाठी आत्मनिर्भरता
आत्मनिर्भर भारत या सरकारच्या नव्या धोरणाचा अर्थही त्यांनीं स्पष्ट केला. आत्मनिर्भरता याचा अर्थ सर्वांशी फटकून वागणे असा नव्हे. भारताला आवश्यक असणाऱया वस्तू आणि सेवा शक्यतोवर भारतातच निर्माण करणे हा याचा अर्थ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भरतेचे महत्व आम्हाला चांगलेच कळून आले आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढविण्याच्या हेतूने हे आत्मनिर्भरतेचे धोरण आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.