ऑनलाईन टीम / मुंबई :
1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळील भीमा_कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावले आहे. 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची याप्रकरणी साक्ष नोंदवली जाणार आहे.
शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. जुलै महिन्यात शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळेच भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळल्याचा आरोप त्यावेळी शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पवार यांची देखील साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी ॲड. प्रदीप गावडे यांनी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.