प्रतिनिधी / बेंगळूर
मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीतील कर्नाटक भवनात रविवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत प्रभुलिंग नावदगी, मोहन कातरकी, व्ही. एन. रघुपती, निशांत पाटील, राजेश्वर, सरकारचे अप्पर मुख्य सचिव राकेश सिंग, पाटबंधारे खात्याचे सचिव अनिलकुमार यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीत राज्य व आंतरराज्य पाणीपुरवठा योजनांविषयी चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने राज्यातील कावेरी खोऱयातील पाणीपुरवठा आणि आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूसह शेजारील राज्यांच्या पाणीपुरवठय़ाबाबत सवित्तर चर्चा करण्यात आली आहे, असे पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
तामिळनाडूत शंकुस्थापना झालेल्या योजनांबाबत प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, या योजनांमुळे राज्याला कोणत्याही समस्या होणार नाहीत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन राज्याच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.