पंतप्रधान मोदींची खोचक टिप्पणी, पहिल्या टप्प्यात भाजपलाच कौल मिळाल्याचे प्रतिपादन
उत्तर प्रदेशात 58 जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी दुसऱया टप्प्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कासगंज येथील जाहीर सभेत विरोधी पक्षांवर टीकेचा जोरदार घाणाघात केला. विरोधी पक्ष आतापासूनच मतदान यंत्रांना दोष देऊ लागले आहेत. त्यांनी 10 मार्चपर्यंत थांबावे आणि त्यानंतर पराभवासाठी मतदान यंत्रांना जबाबदार धरावे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी या जाहीर सभेत केली.
पहिल्या टप्प्यात जनतेने भाजपलाच कौल दिला असून विरोधक निराश झाले आहेत. त्यांना त्यांचे या निवडणुकीतील भवितव्य कळून चुकले आहे. त्यामुळे ते बेताल होऊन बिनबुडाची टीका करीत आहेत. तथापि उत्तर प्रदेशची जनता सुज्ञ असून ती विकास आणि सुरक्षा यांच्यात बाजूने ठाम राहिल. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठे बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचार मुक्त शासन
योगी आदित्यनाथ हे असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्यावर विरोधकांना भ्रष्टाचाराचा एक आरोप करणे शक्य झालेले नाही. गेल्या पाच वर्षांत भाजपने भ्रष्टाचारमुक्त आणि विकासयुक्त असे प्रशासन दिले असून अनेक दशकांमध्ये झाली नव्हती अशी कामे गेल्या पाच वर्षात झाली आहेत. गरिबांसाठी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार अनेक योजना परस्पर सहकार्याने क्रियान्वित करीत आहेत. विरोधी पक्षांना सत्तेवर येण्यासाठी संधी मिळाल्यास ते प्रथम या योजना बंद करतील. लोकांनी त्यांना तसे करण्याची संधी देऊ नये. त्यांनी भाजपच्याच पाठीशी याही वेळी ठाम राहावे आणि विकास सुरक्षित करावा असे आवाहन त्यांनी केले.
अनेक वैद्यकीय महाविद्यालये
उत्तर प्रदेशात भाजप सरकारने वेद्यकीय महाविद्यालयांचे जाळेच उभे केले आहे. अनेक रुग्णालये राज्याच्या कानाकोपऱयात स्थापन केली आहेत. त्यामुळे राज्याने कोरोनाच्या उद्रेकांचा समर्थपणे प्रतिकार केला. पाच वर्षांच्या कालावधीत वैद्यकीय सेवेत इतकी सुधारणा आजवर कोणत्याही सरकारने केलेले नाही. सरकारी आरोग्य योजनांचा अधिक तर लाभ गरिबांना मिळेल असे आश्वासनही त्यांनी दिले.
परिवार वादामुळे प्रचंड हानी
भारतीय जनता पक्ष वगळता उत्तर प्रदेशातील सर्व पक्ष परिवारवादी आहे. एका घराण्याच्या कल्याणासाठी राज्यातील गरिबांना वेठीस धरण्याची त्यांची योजना आहे. तसेच सरकारांचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी नव्हे तर परिवाराच्या समृद्धीसाठी आतापर्यंत केला गेला. तशी स्थिती पुन्हा आणू देऊ नका. परिवारवादी पक्षांना कायमचे घरी बसवा. त्यातच आपले हित आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
भव्य स्वागत
तासगंज येथे पंतप्रधान मोदी यांचे जनतेकडून भव्य स्वागत करण्यात आले. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी सहारणपूर येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले होते. तासगंज येथेही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एकंदरीत पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर उत्तर प्रदेशात वातावरण चांगलेच तापले आहे.