बसप अध्यक्षा मायावती यांना विश्वास
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील 7 व्या टप्प्यातील मतदानादरम्यान देखली मतदार अत्यंत सजग आणि सक्रीय राहतील. सातव्या टप्प्यातील मतदार उत्तरप्रदेशचे चित्र बदलण्याचे काम करतील असा विश्वास बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी रविवारी व्यक्त केला आहे.
9 जिल्हय़ांच्या 54 मतदारसंघांमध्ये सोमवारी होणार मतदानात येथील गरीबी आणि बेरोजगारीने पीडित लोक स्वतःच्या मतशक्तीद्वारे स्वतःचे भविष्य तसेच राज्याचे चित्र बदलण्याचे काम करू शकतात. याकरता बसपचे सर्वजन हिताय अणि सर्वजन सुखायचे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांची आश्वासने विफल ठरल्याचे जगजाहीर आहे. सप, भाजप सरकारच्या काळात उत्तरप्रदेशच्या लोकांची स्थिती सुधारण्याऐवजी बिघडत गेली आहे. याचमुळे या पक्षांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये असे मायावती यांनी ट्विट करत म्हटले आहे.
विरोधी पक्षांनी धनबळासह साम, दाम, दंड, भेद या सर्व प्रकारांचा वापर करून उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. तरीही जीवघेणी महागाई, गरीबी, बेरोजगारी, सरकारची निरंकुशता आणि भटक्या जनावरांमुळे पीडित येथील जनता स्वतःच्या मूलभुत मुद्दय़ांवर ठाम राहिली असल्याचे मायावती म्हणाल्या.