वृत्तसंस्था / भोपाळ :
मध्यप्रदेशच्या गुना येथील अनुसूचित जातीच्या एका शेतकरी कुटुंबाला पोलिसांनी केलेल्या क्रूर मारहाणीच्या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने बुधवारी रात्री उशिरा ग्वाल्हेर विभागाचे पोलीस महासंचालक राजाबाबू सिंग, गुनाचे जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन आणि पोलीस अधीक्षक तरुण नायक यांना त्वरित हटविले आहे.
महाविद्यालयाच्या जमिनीवरील कब्जा हटविण्याची प्रशासनाची मोहीम सुरू असताना तेथे शेती करत असलेल्या शेतकरी दांपत्याने किटकनाशक प्राशन केले होते. त्यापूर्वी पोलिसांनी शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबीयांवर लाठीमार केला होता. बुधवारी या घटनेची चित्रफित समोर आल्यावर जनक्षोभ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान शेतकरी तसेच त्याच्या पत्नीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. तसेच शेतकऱयाच्या 7 मुलांनाही पोलिसांनी सोडले नाही. स्वतःच्या आईवडिलांची झालेली अवस्था पाहून या मुलांनी केलेला शोक काळीज पिळवटून टाकणारा होता.
काँग्रेसकडून टीकास्त्र
शेतकऱयाला झालेल्या मारहाणीबद्दल दुःख व्यक्त करत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात गुंड-गुन्हेगार निर्भय झाले असून राज्य जंगलराजच्या दिशेने परतत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मायावतींकडून निंदा
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी या घटनेची निंदा केली आहे. मध्यप्रदेशच्या पोलीस आणि प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावावर दलित कुटुंबाने पिकविलेले पिक जेसीबी यंत्राने नष्ट करण्यात आले, तसेच संबंधित दांपत्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे अत्यंत क्रूर आणि लज्जास्पद आहे. या घटनेची देशभरातून निंदा होणे स्वाभाविक आहे. सरकारने याप्रकरणी कठोर कारवाई करावी. भाजप आणि त्याचे सरकार एकीकडे दलितांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचा गवगवा करते. तर दुसरीकडे दलितांना विस्थापित करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. काँग्रेसचे सरकार असताना अशाप्रकारच्या घटना घडत होत्या आणि भाजप सरकारमध्येही हेच चालू असल्याची टीका मायावती यांनी केली आहे.