प्रसंगी रस्त्यावर उतरु
वार्ताहर / व्हनाळी
आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून महाराष्ट्रातील सर्व पक्ष, नेते या मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. परंतू काही घटणात्मक बांबीमुळे कोर्टाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली नाही. केंद्र सरकारने आरक्षणातील त्रृटी दुर करून योग्य तो तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे माझे प्रामाणिक मत आहे. मराठा आरक्षणबाबत सर्वच पक्षांनी राजकीय डावपेच करु नयेत. सर्वांनी एक दिलाने एक दिशेने काम केले तर वंचित मराठी समाजाच्या तरुणांना निश्चित न्याय मिळेल. मराठा आरक्षणास सर्व पक्ष, समाज घटकांचा मनापासून पाठिंबा आहे. मराठा आरक्षणा संदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निरपेक्ष, निकोप नेतृत्वाखाली होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात आम्ही प्रामाणिकपणे व सर्वशक्तीनिशी सहभागी होवू. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रसंगी रस्तावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही. मराठा आरक्षणाच्या रास्त मागणीला माझा जाहिर पाठिंबा असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्हन्नाळी (ता. कागल) येथील कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत. संजय घाटगे पुढे म्हणाले,” शाहू महाराजांनी मराठा समाजाला मागासवर्ग म्हणून आरक्षणाची तरतूद केली होती. यांचे सर्वच राजकीय पक्षांनी भान ठेवत मराठा आरक्षणाला राजकीय रंग न देता सर्वच पक्षांनी समन्वयातून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. तसेच १९४२ मध्ये तत्कालीन बॉम्बे सरकारने मराठा समाजाचा समावेश मागासवर्गात केला होता. मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने ५३ मोर्चे शांततेत काढले. आरक्षण मिळावे म्हणून ४० युवकांनी आपले बलिदान दिले आहे. हे सर्व पाहता केंद्र सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणा संदर्भात जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आमच्या सर्व सहकार्यासह सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरण्याचा इशारा संजय घाटगे यांनी दिला.
पत्रकार परिषदेस गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, ए.वाय. पाटील म्हाकवेकर , विष्णुपंत गायकवाड, दत्तोपंत वालावलकर , काकासो सावडकर, के. के. पाटील, महेश देशपांडे, संतोष ढवण उपस्थित होते.
तर ही केंद्र सरकारची जबाबदार राहील
मराठा समाजाची १९९२ पासून आरक्षणासाठी धडपड सुरू आहे. त्यांची ही केविलवाणी धडपड राज्यकर्त्यांनी फारशी मनावर घेतलेली दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देत त्यांच्या अस्मितेशी खेळ सुरु केला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची लढाई लढण्याचा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे. आरक्षणाच्या या संवेदनशील प्रश्नांची घटका आता भरलेले आहे. राज्य सरकारने या प्रश्नांची सर्व पूर्तता वेळोवेळी केली आहे. भविष्यात आरक्षण संदर्भात मराठा तरुणांच्या हातून मोठा अनर्थ घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची राहील. असे घाटगे यांनी सांगितले.