नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून पळून गेलेला वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या याच्यासाठी भारतीय न्यायव्यवस्था कायमची वाट पहात राहू शकत नाही, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने 18 जानेवारीला सुनावणी होईल, असे मंगळवारी स्पष्ट केले आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या याच्याविरोधात अवमानना नोटीस काढली होती.
मल्ल्याने हेतुपुरस्सर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असा आरोप आहे. मल्ल्या याने न्यायालयासमोर उपस्थित राहून आपली मालमत्ता आणि कर्जे यासंबंधी माहिती द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तथापि मल्ल्या याने त्या आदेशाप्रमाणे कृती केली नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याची सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी 18 जानेवारीला होऊन नंतर अंतिम निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणी न्या. यु. यु. लळित यांच्या नेतृत्वातील पीठासमोर होत आहे.