नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने कर्ज घेताना बँकांकडे गहाण ठेवलेल्या शेअर्सचा लिलाव करण्यात येत आहे. स्टेट बँकेने या शेअर्सच्या विक्रीतून 792 कोटी रुपयांची प्राप्ती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे
या प्राप्तीमुळे आतापर्यंत मल्ल्या याची मालमत्ता विकून त्याने घेतलेले कर्ज आणि त्यावर साठलेले व्याज यांची बऱयाच प्रमाणात परतफेड करून घेण्यात आली आहे, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली. याशिवाय नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे. गेल्या महिन्यात मल्ल्याच्या मालमत्तांची विक्री करून बँकांनी 7 हजार 181 कोटी रुपये परत मिळविले आहेत. अशा प्रकारे मल्ल्या याच्या कर्जाची जवळजवळ भरपाई बँकांनी करून घेतली आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कर्जांची परतफेड करून घेण्यासाठी त्यांच्या मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रियाही सुरू आहे.
आतापर्यंत 18 हजार कोटींची वसुली
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आतापर्यंत मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या एकंदर कर्जांपैकी 18 हजार 217 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही रक्कम बँकांना परत देण्यात आली आहे. तसेच काही रक्कम केंद्र सरकारच्या तिजोरीत भरण्यात आली आहे. मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी यांनी एकंदर 22 हजार 585 कोटी रुपये बुडविले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 58 टक्के वसुली झाली आहे. त्यांची आणखी मालमत्ता जप्त करण्यात आली असून तिची विक्री झाल्यानंतर जवळपास 80 टक्के वसुली पूर्ण होईल, अशी माहिती ईडीने दिली. भारत सरकार या तिघांनाही भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मल्ल्या याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. मात्र अद्याप ब्रिटीश सरकारने अनुमती न दिल्याने मल्ल्याला भारतात आणणे शक्य झालेले नाही. असाच प्रकार नीरव मोदी याच्याबाबतही घडला आहे. मेहुल चोक्सी कॅरिबियन बेटांवर दडला असल्याची माहिती आहे.