आठव्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात एका बुद्ध भिक्षुचा प्रवेश होतो. तो लोकांना काही तरी उपदेश करीत आहे. कमी खा. इंद्रियांच्या आहारी जाऊ नका इ.. तो अध्यात्मपर उपदेश करीत असतो. तो म्हणतो, ‘जोपर्यंत तुमच्या चित्ताची शुद्धी होत नाही, तोपर्यंत डोकं, दाढी, मिशा यांचं मुंडण करणं म्हणजे ढोंग आहे!’ त्याच्या वस्त्राचा भगवा रंग उडालेला असतो. म्हणून राजाचा शालक शकाराच्या पुष्करणीत जाऊन तो वस्त्र धुवायला जातो. तेवढय़ात शकार ओरडतो, ‘अरे ए दुष्ट बौद्ध संन्याशा, थांब तिथेच थांब!’ भिक्षु विचार करतो की, हा दुष्ट तर मला बैलासारखं नाक कापून हाकलून देईल. यातून स्वामी बुद्धच मला वाचवतील! शकार त्याला मारायला धावतो. तेव्हा त्याचा विट (सेवक) त्याला अडवतो. बौद्ध भिक्षुला मारणे ठीक नाही. त्याला मारून काय उपयोग? त्यापेक्षा ह्या सुंदर बगिच्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा अशी त्याची समजूत काढतो. तेव्हा भिक्षु त्यांना म्हणतो, ‘आपलं ह्या उद्यानात स्वागत आहे. उपासकांनी प्रसन्न व्हावे!’ तेव्हा शकाराला ‘उपासक’ ही त्याला दिलेली शिवी आहे असे वाटते. पुन्हा विट त्याला सांगतो की, ही शिवी नसून आपण बुद्धाचे सेवक आहात अशी तो तुमची स्तुती करतोय! तेव्हा आपली स्तुती ऐकून शकार खुश होतो. पण हा इथे कशाला आलाय असे विचारल्यावर भिक्षु उत्तर देतो की, तो आपले वस्त्र धुण्यासाठी तिथे आला होता. शकार ते ऐकून पुन्हा संतापतो. त्याला मारायला धावतो. विट पुन्हा एकदा त्याला परावृत्त करतो. भिक्षुला बाहेर काढून शकाराला तिथल्या एका शिलाखंडावर बसायला सांगतो.
शकाराला वसंतसेनेची आठवण येत असल्याचे तो विटाला सांगतो. वसंतसेनेने त्याचा कधीतरी अपमान केलेला असतो. तरीही शकाराचे मन तिला प्राप्त करण्याची लालसा करीत असते. तो स्थावरक गाडी घेऊन येण्याची वाट पहात असतो. कारण त्यातून त्याला जेवायला जायचे असते. पण ती येत नाही. दुपारचा सूर्य रणरणत असतो नि शकाराला खूप भूक लागलेली असते. तिथून जेवायला जायला उठण्यासाठी त्याला पाऊलही उचलवत नाही असे तो विटाला सांगतो. चेट येण्याची वाट बघू लागतो. पण तो येत नाही. म्हणून वेळ घालवण्यासाठी तो गाऊ लागतो. पण विटाला ते आवडत नाही. तुम्ही काय गंधर्व आहात का? असे विचारतो. तेव्हा शकार आपण इतक्मया चांगल्या वस्तू खाल्ल्या आहेत की, अगदी कोकिळेचे मांससुद्धा! मग मी का नाही गंधर्वासारखं का नाही गाणार? असे तो विटाला विचारतो. तेवढय़ात अजून चेट आला नसल्याची त्याला आठवण येते.