प्रतिनिधी / सातारा :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जुना खड्डा बुजवताना नवा खड्डा पडतोय, असे चित्र सध्या दिसत आहे. सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते शिरवळपर्यंत खड्ड्यांची मालिकाच सुरु आहे. महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे अलिशान गाड्यांच्या रिम तुटत आहेत, टायर फुटत आहेत. मोठ्या गाड्यांचे पाटे तुटत आहेत. दुचाकीचे अपघात घडत आहेत. यामुळे महामार्गालगत असलेल्या व्हिल अलायमेंटवाल्यांची चांदी होत असून, पंक्चरवाल्याचा धंदा तेजीत आहे. दरम्यान, एनएचआयचे अधिकारी आवटी हे आऊट ऑफ कव्हरेज आहेत. त्यामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या प्रश्नी सातारकर जनता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.
सातारा जिल्ह्यातून 125 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जातो. याच महामार्गाचे अजूनही काही ठिकाणचे तीन पदरीचे काम राहिले आहे. मात्र ज्या ठिकाणी तीन परदीचे काम झाले आहे, तेथेच गेल्या दोन वर्षापासून पडलेले खड्डे बुजत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन वर्षापूर्वी पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पेव्हर ब्लॉकने रस्त्यावरचे खड्डे बुजवणे म्हणजे आणखी अपघाताला निमंत्रण आहे. पावसाळय़ात पुन्हा महामार्गावर अपरक्ष खड्डय़ांची चाळण झाली. शेंद्रे येथील सात बारा या हॉटेलपासून ते सातारा शहरापर्यंत येणारा रस्ता हा दुतर्फा खड्डेमय झालेला आहे. खिंडवाडी येथे तर पडलेल्या खड्डय़ामुळे अनेक वाहनांची टायर फुटलेली आहेत. टायर नुसती फुटत नाहीत तर रिमाही बाद होत आहेत. जोराने जाणाऱ्या दुचाकींची कामे निघत आहेत. तोच प्रकार पुढे वाढेफाटा ते वेळे, शिरवळपर्यंत सगळी रस्त्याची वाट लागलेली आहे. दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे पडलेले आहेत.
एनएचआयचे अधिकारी आऊट ऑफ कव्हरेज
सातारा जिल्ह्यासाठी एनएचआयचे अधिकारी म्हणून आवटी यांच्याकडे पदभार आहे. त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे. त्यांच्याकडून किमान महामार्गाला का खड्डे पडले आहेत, याची तपासणी केली तरी समजेल. महामार्गावर पडलेल्या खड्डय़ाच्या प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे आंदोलन करणार आहेत.